Eknath Shinde: विधानपरिषदेच्या 18 जागांपैकी 6 जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अडून बसले असल्याने या जागावाटपाचा वाद आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दरबारात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर (Delhi Tour) आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "राजकीय बैठकीसाठी मी दिल्लीत आलो नव्हतो. राज्याच्या विकासकामासाठी आलो होतो."
Eknath Shinde: अगोदरच्या सरकारला केंद्राशी बोलणे कमीपणाचे वाटायचे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही दोन दिवसांपासून दिल्लीत आहोत, त्याबाबत एवढा प्रश्न का पडला आहे? राज्यातील जनतेसाठी आणि महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्राकडे भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्यच आहे. महाराष्ट्रातील कांदा आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न असोत किंवा जलजीवन मिशनचे प्रलंबित प्रकल्प. राज्याचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही केंद्राकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार? अशी विचारणा त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, "जनतेच्या हितासाठी केंद्राशी संवाद साधण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटत नाही. अगोदरच्या सरकारला केंद्राशी बोलणे किंवा मदत मागणे कमीपणाचे वाटत असेल, पण आमची तशी भूमिका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रासाठी नेहमीच मदतीचा हात दिला असून राज्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी केंद्राकडून मिळाला आहे."
Eknath Shinde: शेतकरी आणि विकासकामांवर लक्ष
या दिल्ली दौऱ्यात प्रामुख्याने कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, ग्रामीण भागातील घराघरांत पाणी पोहोचवणाऱ्या 'जलजीवन मिशन' अंतर्गत रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. या सर्व बैठका अत्यंत सकारात्मक झाल्या असून केंद्राकडून या प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. केंद्राकडून मिळणारे हजारो कोटी रुपये राज्यासाठी आणायचे असतील, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तेच प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.
Eknath Shinde: महायुती विधान परिषदेच्या सर्व जागा जिंकेल
विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडी (MVA) 17 जागा लढवेल, पण एकही जागा जिंकेल असे मला वाटत नाही. महायुती 17 जागा लढवेल आणि सर्व जागा जिंकेल, असे त्यांनी म्हटले.
विधान परिषद निवडणुकीसाठी 1 जून रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस (Deadline) आहे. मात्र, महायुतीमध्ये अद्याप जागावाटप अधिकृतपणे जाहीर झाले नाही. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, "महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाही. विधान परिषदेचे जागावाटप हे सन्मानाने होईल. महायुती एकजुटीने 17 जागा लढवून सर्व जागा जिंकेल, असे त्यांनी म्हटले.
Eknath Shinde: ठाकरे गट किती नंबरला गेलेत हे त्यांनाच कळत नाही
विरोधी पक्षावर हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती मजबूत आहे. फडणवीस मित्र आहेत म्हणून सांगत आहे. भाजप-शिंदे एकत्र आहेत. आम्ही एकत्र काम करत आहोत, विकास करत आहोत. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे. त्यांच्या पचनी पडत नाहीये, म्हणून दिशाभूल करणारी वक्तव्यं ते करत आहेत. आज भाजप महाराष्ट्रात सगळ्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा आणि आमची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाची आहे. ठाकरे गट किती नंबरला गेलेत हे त्यांनाच कळत नाही. टोकाची भाषा करणारे लोक आज काय परिस्थिती झाली आहे? 'तू राहशील एकतर नाहीतर मी राहीन' अशाप्रकारचं वक्तव्य करुन त्यांनी त्यांची परिस्थिती दाखवली आहे. ज्यांनी अगदी टोकाची भाषा वापरली आता त्यांचं बदललेल रुप केविलवाण आहे," असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
