मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळाले आहेत. शिंदे यांनी आपल्या शिवसेना पक्षांच्या सर्व मंत्र्यांना मैदानात येऊन कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या स्वहस्ते येत्या 4 मार्च रोजी उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाने एक वैद्यकीय कक्ष यापूर्वीच सुरू आहे, मात्र आता शिंदे यांच्या प्रवेशानंतर दोन वैद्यकीय कक्ष सुरू होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाला टक्कर देणारा नवा वैद्यकीय फॉर्म्युला आता एकनाथ शिंदे यांनी अंगिकारला असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. किंबहुना फडणवीसांशी स्पर्धा करण्यासाठी शिंदे यांनी हे सूत्र स्वीकारले की काय? असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.
एकनाथ शिंदे यांची रणनीती नेमकी काय?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना 51 हजार रुग्णांना 419 कोटी रुपये दिले. या कामामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकांच्या ओढा कायम सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते रुग्णांच्या मदतीसाठी हा कक्ष सुरू करत आहेत. दरम्यान, शिंदे यांच्याकडे आता पाच वर्षांचा कालावधी असून त्यानुसार ते आपली पावले टाकत आहेत. शिंदे यांचे 4 मार्चपासून वैद्यकीय सत्र सुरू होत आहे. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमजवळ, जिथे महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प आणि महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष ठेवले जाते. किंबहुना शिंदे यांनी डीसीएम समन्वय समिती कक्ष तयार केला आहे, जेणेकरून ते राज्यातील प्रकल्पांचाही आढावा घेऊ शकतील.
CM फडणवीस-एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर?
महाराष्ट्रात सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध लपून राहिलेले नाही, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची आशा होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याने ती आशा तेव्हाच धुळीस मिळाली होती. महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापासून ते खात्यांच्या विभाजनापर्यंत, तर कधी रायगडच्या पालकमंत्रिपदावरूनही दोन्ही पक्षांत एकमत होत नसल्याचे पुढे आले आहे. अशातच शिंदे- फडणवीस शीतयुद्ध अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.
एकनाथ शिंदेंची नाराजी कायम?
एकनाथ शिंदे सरकारमध्ये येण्यास तयार नव्हते, तर दुसरीकडे सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदावरून शिंदे नाराज आहेत. नुकतेच शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीत स्थान देण्यात आले नव्हते, मात्र त्यांच्या नाराजीनंतर नवीन नियम बनवून त्यांचा समावेश करण्यात आला. तसेच रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही मिटलेला नाही. शिंदे शिवसेनेचे नेते आणि त्यांचे समर्थक सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे, असे जाहीरपणे सांगत असले तरी अंतर्गत असंतोषाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी शमवण्यात भाजपला यश न आल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा