संभाजीनगर : शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते, शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. पूरग्रस्त शेतकरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विरोधकांवर टीका करताना त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं. तसेच, ठाकरे बंधूंच्या युतीवरुनही टोला लगावत कार्यकर्त्यांना मंत्र दिला. जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे आहे. येतांना बघितले नुकसानग्रस्त कोणते कोणते तालुके राहिले आहेत, याची माहिती घेतली. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही, असा शब्द शिंदेंनी येथील मेळाव्यातून दिला.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाचा चेक देणार असं उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिले होते. मात्र, ती दिली नाही, परंतु आपल्याकडून तात्काळ एक लाखाची मदत पीडित कुटुंबाला द्या अस मी पालकमंत्री संजय शिरसाठ, संदीपान भुमरे यांना सांगितले होते. त्यानुसार, आधी आमचे मदतीचे ट्रक जातात, नंतर तिथे एकनाथ शिंदे जातो ही परंपरा आहे. कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजन बंद होणार नाही. माझ्यावर दररोज आरोप करत होते. मी मुख्यमंत्री झाल्यापासून आरोप होता. हा घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे घटनाबाह्य सरकार आहे. सरकार परवा जाईल, तेरावा जाईल असे म्हणत होते. तुम्हालाही भीती वाटली असेल परंतु त्यांचा ज्योतिषी बोगस होता, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
लंडन दौऱ्यावरुन शिंदेंची टीका (Uddhav Thackeray on london tour)
मी आपल्याला एवढाच सांगतो की, विरोधी पक्षात कोण कुणाशी मनोमिलन करत आहे याची चिंता करू नका. त्यांची सगळी गणित, समीकरण आपल्याकडे आहेत, असे म्हणत नाव न घेता ठाकरे बंधूंच्या युतीवर शिंदेंनी टोला लगावला. आपण महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिंकली, महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकणार आहोत. काल ब्रिटनचे पंतप्रधान आले म्हणाले, एकनाथ शिंदेचे बॅनर लावले, पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती आहे. आत्तापर्यंत दिल्लीत बैठक होत होत्या, पण मुंबईत पहिल्यांदा झाली आहे. आम्ही पोस्टवर, फिल्डवर असतो, तुमच्यासारख एसीमधे चिल्ड होत नसतो, असाही टोला शिंदेंनी लगावला. आमच्याकडचे काही लोक लंडनला येतात त्यांच्यावर लक्ष ठेवा, सारख्या फेऱ्या मारतात. तिकडून जाऊन आले की इकडे म्हणतात, माझे हात रिकामे, माझ्याकडे देण्याखारखं काही नाही. सगळ तिकडे जाऊन जमा केल्यावर हातात कसं काय राहणार, अशी बोचरी टीका करत लंडनच्या पैशावरच भाष्य एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं.
आता मुंबई बाकी आहे, शिंदेंचा टोला (Eknath Shinde mumbai election)
हंबरडा फोडणार म्हणाले, शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याऐवजी राजकारण करत आहेत. मात्र, राजकारण करायला जागा कुठं आहे. हंबरडा कधी फोडला २०२२ ला सगळं गेल तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, सगळं गेलं, आता काय राहिलं. आता मुंबई बाकी आहे त्यासाठी आवाज बाकी ठेवा मोठा हंबरडा फोडायचा आहे, अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. तसेच, आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या, त्यांनी 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आहेत, त्याहीवेळी त्यांनी हंबरडा फोडला होता. शेतकऱ्यांबद्दल जाणीव असली पाहिजे, शेतकऱ्याबद्दल वेदनाची जाणीव असली पाहिजे, आम्ही 32 हजार कोटींचे पॅकेज दिले, असेही शिंदेनी यावेळी सांगितले.