बुलढाणा: भावनेच्या भरात बोलताना संजय गायकवाड हे वाहून जातात. पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)  यांचे कान टोचले आहे. संजय गायकवाड यांनी काल (शनिवारी) पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरती नाराजी व्यक्त केली होती. सोबतच त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे करणार असल्याचेही म्हणाले होते. त्यावरून संजय गायकवाडांनी दिलगिरीही व्यक्त केली. अशातच आज एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांना पुन्हा एकदा समज देत आपण जबाबदार शिवसैनिक असल्याची आठवण करून दिली आहे. ते बुलढाणा येथील आभार सभेत बोलत होते.

पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो -एकनाथ शिंदे

संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेलं विधान आणि त्या मागचा उद्देश हा पूर्ण पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता. मात्र त्यांनी बोलताना खबरदारी बाळगली पाहजे. शिवाय त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहेत. संजयराव तुमच्या काही पोलिसांबाबत तक्रारी असतील तर माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्‍यांकडे करा, परंतु तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होता कामा नये. त्यांचा आदर केला पाहिजे. वर्दीचा आदर सर्व शिवसैनिकांनी राखला पाहिजे. मी स्वता: संजय गायकवाड यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. मलाही वाईट वाटलं असून संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी स्वता: मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. 

 हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल-एकनाथ शिंदे 

काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता. त्या ठिकाणी जाणे हे माझं कर्तव्य होतं. मात्र त्यातही विरोधक राजकारण करतात. हा देशावर हल्ला आहे.देशाच्या आत्म्यावर हल्ला आहे. मात्र पंतप्रधान मोदीजी सक्षम आहेत. खून का बदला खून से ही आपली सर्वांची भावना आहे. आता ही आरपारची लढाई असेल. हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल. आता घुसके मारने वाला भारत आहे. सगळे भारतीय आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहेत. देशातील सर्व पक्ष अतिरेकी हल्ल्यानंतर मदतीला गेले. मात्र उबाठा गेले नाहीत, हे यांचं देशप्रेम? असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. 

विरोधकांना बांबू लावत नाही तर बांबू लागवडीसाठी अनुदान देतो  

दरम्यान, यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी फक्त तीन कोटी रुपये दिले, मी जीव वाचवण्यासाठी 400 कोटी रुपये वाटले. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पाच वर्षाचा वचन नामा जो दिलाय तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करणारच. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत. हे आमचं सरकार दिलेला शब्द पाळणारे आहे. आम्ही सुरू केलेल्या योजनांमुळेच यावेळी आम्हाला क्रांतिकारी विजय मिळाला. आम्ही विरोधकांना बांबू लावत नाही तर बांबू लागवडीसाठी अनुदान देतो. योजनांसाठी पैसे कधीही कमी पडू देणार नाही, एवढा शब्द आपणास देतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा