Devendra Fadnavis in Vidhansabha: टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis speech: देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. टिपू सुलतान स्वत:चं राज्य वाचवायला इंग्रजांशी लढला, हे आपल्याला कधीच सांगण्यात आले नाही,

Devendra Fadnavis speech in Vidhansabha: टिपू सुलतान हा चांगला होता की नाही, नंतरची गोष्ट आहे. पण आमचा आक्षेप या गोष्टीवर आहे की, कोणीतरी म्हणतं टिपू सुलतान (Tipu Sultan) छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे राजे होते. छत्रपती शिवरायांइतकं गुणगान टिपू सुलतानाचं केलं पाहिजे, असे म्हटले जाते, या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. गेली अनेक वर्षे देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते. यावेळी त्यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) तुलनेच्या मुद्द्यावरुन विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
गेली अनेक वर्षे या देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. वर्षानुवर्षे आपल्याला हे शिकवण्यात आले की, टिपू सुलतान हे महान राजे होते. पण टिपू सुलतानाने 75 हजार हिंदू आणि 33 हजार नायरांची कत्तल केली, हे कधी शिकवण्यात आले नाही. ते इंग्रजांशी का लढले हे कोणी सांगितलं नाही. टिपू सुलतान स्वत:चं राज्य वाचवायला इंग्रजांशी लढला, हे आपल्याला कधीच सांगण्यात आले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आता खरा इतिहास समोर येत आहे. वर्षानुवर्षे देशात एनसीआरटीच्या पुस्तकात मोघली साम्राज्याला 17 पानं देण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या पुस्तकात एकच परिच्छेद होता. आता मोदी सरकारने एनसीआरटीच्या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासाला 20 पानं दिली आहेत. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर आज देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधीच शिकवला नाही. या देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. मला त्यांच्याविषयी कुठलाही आक्षेप नाही. पण जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमणकाऱ्यांना हिरो मानतील, त्यांना आम्ही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
Maharashtra Vidhansabha Adhiveshan: विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित आहे: देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांना लक्ष्य केले. विरोधी पक्ष हा भ्रमित आणि संभ्रमित आहे, असे दिसते. माझी त्यांना सूचना आहे की, भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी शांतपणे विचार करुन मुद्दे मांडले पाहिजेत. जेणेकरुन महाराष्ट्राच्या हितात तुमचे योगदान वाढेल. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, विकसित भारत, महाराष्ट्राची वाटचाल याबाबत विरोधी पक्षाच्या मनात गल्लत आहे. त्यांनी हा विषय नीट समजून घेतलेला नाही, किंवा त्यांना तो समजलाय पण त्यांना जनतेला संभ्रमित करायचे आहे. आम्हाला मनात कुठेही शंका नाही, महाराष्ट्र देशातील पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल. भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा आताच पार केला आहे. महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपण दरवर्षी 3 लाख 60 हजार कोटींचा जीएसटी जमा करतो. जीएसटीबाबत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आपल्या आसपासही नाही. कृषी निर्यात आणि सेवा क्षेत्रातही महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राने जीडीपीच्या तुलनेत कर्जाच्या गुणोत्तराचे प्रमाणही उत्तम ठेवले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
























