Devendra Fadnavis पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ॲग्री हॅकेथॉन पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी, पार्थ पवार यांची भेट आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. कर्जमाफी संदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात कॅबिनेट उपसमितीची बैठक झालेली आहे. काही अधिकची माहिती आम्ही मागवली आहे. ती आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु करु, 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Continues below advertisement

पार्थ पवारांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

काल मला पार्थ पवार येऊन भेटले. काही प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते. त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळं ते मला येऊन भेटणे ही काही मोठी बातमी आहे, असं मला वाटत नाही, असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं. 

राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही, आपल्याला आवश्यक त्यापेक्षा जास्त ऊर्जा आहे. एखाद्या ठिकाणी कधीतरी ग्रीड फेल्युअर होतं,त्यामुळं काही काळाकरता, काही तासांकरता ऊर्जा संकट तयार होतं.  राज्यात भरपूर वीज आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.  

Continues below advertisement

ड्रग्ज विरोधातील लढाई जिंकणार : देवेंद्र फडणवीस

राजू शेट्टी यांच्या ड्रग्ज संदर्भातील टीकेबाबत प्रश्नाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आकडे पाहायला मिळतात, पंजाबची, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे? महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बदनाम करणं राजू शेट्टींना शोभत नाही. अंमली पदार्थ हे मोठं आव्हान महाराष्ट्रासमोर देशासमोर आहे. देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींच्या नेतृत्वात ड्रग्ज विरोधात मोठी लढाई सुरु केली आहे. महाराष्ट्र त्यात अग्रणी आहे, काही काळ लढा द्यावा लागेल, आपण यशस्वी हा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मराठा समजासाठी अनेक गोष्टी केल्या :  देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सातत्यानं मराठा समाजाकरता राज्य सरकारनं अनेक गोष्टी केल्या आहेत. सारथी सारखी संस्था तयार करुन आपले अनेक तरुण आयएएस, आयपीएस, एमपीएससी, स्पर्धापरीक्षांमध्ये उत्तम यश मिळवत आहेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून विक्रमी संख्येनं उद्योजक तयार केले आहेत. शिक्षणाचं क्षेत्र असो स्कॉलरशिप सुरु आहे. ज्यांना होस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्या करता निर्वाह भत्ता चालवत आहोत.  कोणताही योजना बंद नाही. प्रमाणपत्र मागितलं आहे आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही. जे प्रमाणपत्र मागितले जातात जे नियमात बसतात ते सगळे दिले जात आहेत. वॅलिडिटीची प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केले जातात. त्याची कमिटी सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे, निकष सर्वोच्च न्यायालयानं ठरवलेत, त्या समितीला सर्वाधिकार सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करु शकत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.  

सातारा गॅझेटचा संबंध आहे, आपल्याला माहिती आहे हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस उच्च न्यायालयात चालली आहे. अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही. कंटेम्पट ऑफ कोर्ट होऊ नये त्यासाठी लॉ अँड ज्युडिशिअरीनं दिलेल्या सल्ल्यानुसार काम सुरु आहे. कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत उलट अधिक ताकदीनं त्या चालवत आहोत. जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी केलं, मला वाटत नाही महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या सरकारमध्ये हे झालेलं आहे. तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.