पुणे: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोनाफोनी सुरू होती, आता अखेर आज दुपारी काँग्रेस आपला अर्ज परत घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस उमेदवार बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सोबत काल सर्वप्रमुख नेत्यांची चर्चा झाली, अनेकांनी आपली भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत व्यक्त केली. माघार घेतली पाहिजे अशी अनेकांची भूमिका होती. आता प्रदेशाध्यक्ष सर्व नेत्यांची भावना केंद्रीय श्रेष्ठींना कळवतील, त्यांच्या परवानगी दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याचा निर्णय होईल अशी शक्यता आहे.
शरद पवारांचा मल्लिकार्जुन खरगेंना फोन अन् भाकरी फिरली....
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत शरद पवारांची चर्चा झाल्यानंतर बारामतीमधे आपला उमेदवार मागे घेत असल्याचं खर्गे यांचं शरद पवारांना आश्वासन दिल्याची माहिती आहे. एक तासापूर्वी दोघांतील चर्चेनंतर निर्णय झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. एक तासापुर्वी दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर आता काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबतची माहिती काही वेळात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याबाबतची घोषणा करतील तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा उमेदवार अर्ज माघारी घेईल अशी माहिती आहे.
विजय वडेट्टीवारांनी नेमकं काय म्हटलंय?
बारामतीतील पोटनिवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्ज परत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत. याच काळामध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी शरद पवार यांनी चर्चा केली आहे त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा करत विनंती करत बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटले, त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबतं देखील सुरू झाली आहेत. तर या सर्व घडामोडींवरती भाष्य करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीत लढवत आहेत, तेथील एकूण परिस्थिती पाहता आणि आमच्या सगळ्यांची भावना लक्षात घेता तिकडे या निवडणुकीमध्ये पुढे जाणं थांबावं अशा प्रकारची भावना भूमिका दिसली, त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचं एकमत झालं आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे, प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत, कदाचित मलाही फोन येईल, विचारणा होईल आणि त्यांच्या कानावर टाकूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बारा मती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांनीही आम्हाला वारंवार विनंती केली आहे. यापूर्वी देखील निवडणुका झाल्या आहेत. बाकी वेळी भारतीय जनता पक्षाने काही पाळलं नाही. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालेल्या नव्हत्या. अनेकांच्या अजित दादांबद्दलच्या भावना आहेत, नेता म्हणून असलेले प्रेम आहे, लोकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या मनात त्यांच्याबद्दल अग्रगण्य स्थान आहे, यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा उमेदवारी अर्ज आहे, ही भावना अनेकांनी बोलून दाखवली. त्यामुळे नेत्यांनी चर्चा करून हाय कमांडला विचारणा केलेली आहे, कमांडचा आदेश आला की ती बाकीची प्रक्रिया पूर्ण होईल, असं मला वाटतं. त्यांना विचारून आम्ही हा निर्णय घेणार आहोत. आमच्या मनात ज्या काही भावना आहेत, आम्ही त्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
