Parth Pawar Congress: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती अव्हेरुन आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सध्या जुंपली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन बारामती पोटनिवडणुकीत (Baramati Bypoll 2026) पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला होता. काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला दुषणे देत ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली होती. पार्थ पवार यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. (Maharashtra Politics news)

धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील, असे महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे, असेही काँग्रेसने पार्थ पवार यांना सुनावले आहे. यावर आता पार्थ पवार काही प्रत्युत्तर देणार का, हे बघावे लागेल.

Parth Pawar news: पार्थ पवार नेमकं काय म्हणाले?

माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिलाय. 

लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असेही पार्थ पवार यांनी म्हटलं. 

आणखी वाचा

'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...