Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल: 63 ZP, अन् 126 पंचायतींवर कोणाचा झेंडा फडकणार?
ग्रामीण भागातील विकासकामे आणि निधीवाटपाच्यादृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात. मराठवाड्यात सर्वच स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Chhatrapati Sambhajinagar ZP election Result: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राजकीय समीकरणे सतत बदलत असतात. या बदलणाऱ्या राजकीय वर्तुळात महाराष्ट्राच्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. या निवडणुकांमधून कोण गुलाल उधळणार आणि कोणाला पराभवाची धूळ चारावी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या 12 जिल्हापरिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.28 टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागातील विकासकामे आणि निधीवाटपाच्यादृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात.
मराठवाड्यात सर्वच स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 72 टक्के मतदान झालं. जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायतसमितींचे 126 गण यांचा फैसला आज होणार आहे. या निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 तालुके असून या पंचायत समितीच्या चाव्या कोणाच्या हातात राहणार ? हे आज स्पष्ट होणार आहे.
मतदान किती झाले?
छत्रपती संभाजीनगर झालेले मतदान- 72.69 टक्के
एकूण मतदार: 2,95,766
मतदान झाले: 72.69%
पुरुष मतदार: 155224
महिला मतदार: 140527
9 पंचायत समिती - 126 गण
1. सोयगाव पंचायत समिती
2. सिल्लोड पंचायत समिती
3. कन्नड पंचायत समिती
4. फुलंब्री पंचायत समिती
5. खुलताबाद पंचायत समिती
6. वैजापूर पंचायत समिती
7. गंगापूर पंचायत समिती
8. छत्रपती संभाजी नगरपंचायत समिती
9. पैठण पंचायत समिती
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गटांमध्ये मुख्य लढती
सिल्लोड – अंभई गट
- समीर सत्तार (अब्दुल सत्तार यांचे पुत्र)
- त्र्यंबक गव्हाणे (भाजप) अंभई गटात सत्ताधारी व भाजप यांच्यात थेट लढत.
पैठण – पाचोड गट
- शिवराज भुमरे (संदीपान भुमरे यांचे पुतणे)
- विलास शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) भुमरे घराण्याची ताकद विरुद्ध राष्ट्रवादीचे आव्हान.
वैजापूर – शिवूर गट
- संजय निकम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- सुनील पैठणपगारे (भाजप) दोनच प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना.
कन्नड गट - नागद गट
- पूनमबाई राजपूत (माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पत्नी – शिवसेना UBT)
- चंद्रकलाबाई उत्तम राठोड - शिवसेना शिंदे
हातनूर गट
- मीनाक्षी पवार (भाजप – आमदार बबनराव लोणीकर यांची कन्या) राजकीय घराण्यांमधील प्रतिष्ठेची लढत.
- रंजना राठोड - ( UBT शिवसेना )
गणोरी गट
- निखिल चव्हाण भाजप ( आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे)
- संदीप बोरसे (मविआ) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष.
आडगाव बु. गट
- रामू शेळके (भाजप) माजी जिल्हा अध्यक्षाचे पती
- विजय घोडके (शिवसेना) पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत.
बिडकीन गट
- विजय चव्हाण (भाजप)
- मनोज पेरे (शिवसेना UBT) तिरंगी लढतीमुळे मतविभागणीची शक्यता.
ढोरकिन गट
- राधिका जगताप (शिंदे गट शिवसेना)
- सुनीता वाघचौरे (राष्ट्रवादी काँग्रेस – माजी आमदारांची पत्नी) महिला उमेदवारांमध्ये चुरशीचा सामना.
संभाजीनगरच्या मिनी मंत्रालयाचे कारभारी कोण ?
2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्या काळातील राज्यातील राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निकालांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळालं होतं. त्यावेळी ग्रामीण भागातील मतदारांचा कल आणि पक्षीय ताकद या दोन्ही गोष्टींनी निकालांवर प्रभाव टाकला होता. दरम्यान जिल्ह्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा तापताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सिल्लोड-सोयगाव हा आमदार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ वगळता उर्वरित तालुक्यांमध्येच ही युती लागू करण्याचा विचार होता. अर्ज भरण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या. काही तालुक्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी युतीला विरोध दर्शवला. “स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी” अशी भूमिका अनेक ठिकाणी उघडपणे मांडण्यात आली. त्यामुळे जाहीर केलेली युती प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरेल, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेना युतीची सत्ता येणार असल्याचे कल हाती येत आहेत. गेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत 23 जागांसाठी भाजप सत्तेत आला होता. तर 20 जागा जिंका तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. दोन्ही पक्षांच्या सदस्यांची बेरीज 46 म्हणजेच बहुमतापेक्षा अधिक होती. त्यामुळे भाजप शिवसेना युतीच यावेळी जिंकेल असं सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांचा आराखडा तयार केला जातो. ग्रामविकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांची अंमलबजावणी पंचायत समित्यांमार्फत केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा म्हणून या समित्या ग्रामीण विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
























