Chhagan Bhujbal on Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिंडोरी येथील खेडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना  "मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे? आम्ही आमच्या पैशाने खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही", असे वक्तव्य केले आहे. यावरून महायुतीच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या हा विषय एकाच वाक्यात उरकला आहे. 

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? 

मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांनी मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, असे वक्तव्य केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत छगन भुजबळ यांनी कुणी काय खावं याच्याकडे जास्त लक्ष देण्याचे गरज नाही, असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.  

लाडकी बहीण योजेनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांवर कारवाई व्हावी 

दरम्यान, 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्हयात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्या वेळेला निवडणुका एकदम तोंडावर होत्या. सर्व आमदार, मंत्री आपापल्या निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यावेळेस कोणी काय नोंदवलं हे पाहायला वेळ नव्हता कारण की ठराविक वेळेत ते सुरू करायचं होतं. त्यावेळेस मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती. काही ठिकाणी गडबड आहे, असं वाटतं. निवडणूक झाल्यावर सर्वांची चौकशी करण्यात यावी. जे नियम आपण ठरवून दिले आहेत त्या नियमाच्या बाहेर जाऊन सर्वांनी पटापट अर्ज भरले. त्यावेळेस कोणाला नाही म्हणणं कठीण होतं. कोणीच ऑब्जेक्शन घेत नव्हतं. आता त्या गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. मात्र, मी मागे सुद्धा सांगितलं आहे की कुठलीही कारवाई न करता ज्या भगिनींनी चुकीचे लाभ घेतले आहे त्यांनी स्वतःहून ते लाभ सोडून दिले पाहिजेत. काही ठिकाणी पुरुषांनीही लाभ घेतले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.  

आम्हाला बहिणींचं प्रेम हवं, अन् भावांचंही हवं

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनविल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. आम्हाला बहिणींचं सुद्धा प्रेम हवं आहे आणि भावांचं सुद्धा प्रेम हवं आहे. भावांच्या बाबतीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विचार आपण वेळोवेळी करणार आहोत. शेतकऱ्यांना काय लागतं. पाणी लागतंय, विज लागते, बियाणे लागतात, चांगले बाजार भाव लागतात, रस्ते लागतात हे सर्व करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. हे सर्व तर लाडक्या भावांसाठीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Ajit Pawar video: बोगस लाभार्थ्यांबद्दल विचारताच अजित पवार चिडले, म्हणाले, 'आता लाडकी बहीण योजना बंद करु का?'