BMC Election: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Body Election) रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने (Congress) मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत (BMC Election) मोठी घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे त्यांनी म्हटले आहे.     

Continues below advertisement

विजय वडेट्टीवार म्हणाले की, जगातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबईची आहे. आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे कोणाला किती जागा? हा प्रश्न निर्माण होत नाही. हायकमांडशी चर्चा करुन स्थानिक पातळीवर निर्णय घेतला आहे. मतांचं विभाजन होईल असं मला वाटत नाही. आम्ही मुंबईत लढत आलो आहोत. आमच्या नेहमी 30 ते 35 जागा निवडून येत असतात. महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत आहेत. त्यांचे विभाजन होत नाही. मग आमच्या विभाजनाची चिंता कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 

Vijay Wadettiwar: जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण...

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. आम्ही सगळ्यांनी अधिकार स्थानिक पातळीवर दिलेत. समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करु. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. निवडून येण्याचे निकष हा घटक आमच्यासाठी दुय्यम आहे. त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळेल. जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण कार्यकर्त्यांना न्याय देणे उद्देश आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

Vijay Wadettiwar on NCP Sharad Pawar: शरद पवारांचा प्रस्ताव आला तर विचार करू

उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करत असतील आणि युतीचा प्रस्ताव आला तर स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. मनसे व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली व त्यानंतर मग उद्धव ठाकरे यांच्या प्रस्ताव आला तर काय करायचं? हे मुंबई काँग्रेस त्या प्रस्तावावर विचार करेल. शरद पवार यांचा प्रस्ताव आला त्याचा पण विचार करू. मात्र, काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढायचं असा आमचा निर्णय झाला आहे, अशी घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केलीय. 

Nashik Politics: नाशिकमध्ये मनसे अन् मविआ एकत्र रिंगणात

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची पत्रकार परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाशिकच्या स्थानिक नेत्यांनी लवकरच महागठबंधन होणार आहे. भाजपच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढला आहे, गुन्हेगारी वाढली आहे.जातीजातीत भांडणे लावले जात आहेत.येत्या निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी आणि आम्ही सर्व एकत्र येऊन लढणार आहोत, अशी घोषणा नाशिकच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबईत जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी नाशिकमध्ये मात्र मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचे दिसून येत आहे. 

आणखी वाचा

BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती