Mangal Prabhat Lodha मुंबई: मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असे या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे. या निर्णयानुसार सद्यस्थितीत खाजगी संस्थांच्या सहकार्याने 30 ते 35 शाळा चालवल्या जात आहेत आणि त्यात मालवणी टाऊनशिप स्कूलचाही समावेश आहे. प्रयास फाउंडेशनच्या पुढाकारामुळे मालवणी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला विरोध का? असा थेट सवाल मंत्री आणि भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई महापालिका मालवणी टाऊनशिप स्कूल येथे प्रयास फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात मंगल प्रभात लोढा बोलत होते.

Continues below advertisement


मालाडमध्ये सर्वाधिक सरकारी जमीन होती. त्यावर भीषण अतिक्रमण झाले. आता महापालिकेच्या शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होतोय का? येथील आमदारांनी काय विकास केला ते त्यांनी सांगावे. मालवणीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या आणि बांगलादेशी कुठून आले? त्यांना इतके सहकार्य कोणी केले? त्या मागचा हेतू काय? असा रोखठोक सवाल मंगल प्रभात लोढा यांनी केला. तसेच आज आम्ही मालवणीत विकासाचे काम करत आहोत. मुलांना उच्च दर्जाच्या सुविधा देत आहोत. या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची मुले परदेशात शिकतात. लोकांची दिशाभूल त्यांनी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनात विकासकामात अडथळा निर्माण कारण्याऱ्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही, असंही मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. 


शाळेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही केला जाहीर-


मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सदर शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. या निधीतून विज्ञान प्रयोगशाळा, रोबोटिक्स लॅब, कम्प्युटर लॅब, व्यायामशाळा, खेळांचे साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र लोढा यांनी आजच्या कार्यक्रमात प्रस्तुत केले. दर्जेदार सुविधांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असंही मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.






वर्षा गायकवाडांचा मंगल प्रभात लोढांवर आरोप-


शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले. मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. याला पालकांचा व काँग्रेसचा तीव्र विरोध असून भाजपा सरकारचा हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.


राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:



ही बातमीही वाचा:


मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप