Anil Gote on Jaykumar Rawal : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार गटाच्या जिल्हा आढावा बैठकीत बोलताना शंभर दिवसांत एक बळी गेला आहे, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा दावा केलाय. यानंतर मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांची जमीन हडप केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. आता माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी जयकुमार रावल यांच्यावर सनसनाटी आरोप केलाय. जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, असे त्यांनी म्हटले आहे. 

अनिल गोटे म्हणाले की, जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटरहेडचा वापर करून, अधिकाऱ्यांवर दबाव आणून तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश डावलून दोन कोटी 65 लाख रुपये शासनाच्या तिजोरीतून हडप केले आहे, असा आरोप त्यांनी केलाय. तर आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचे कट करताना रचले जात आहे, असा देखील आरोप त्यांनी केलाय.  

अनिल गोटेंचा संतोष देशमुखांसारखाच बंदोबस्त केला पाहिजे

मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचाराविरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे.  वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्नप्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख यांच्या सारखाच बंदोबस्त केला पाहिजे, अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिल्याचा दावा देखील अनिल गोटे यांनी केलाय. अनिल गोटे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

संजय राऊतांचा आरोप

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्रात मंत्रिमंडळात अशी अनेक पात्रे आहेत ज्यांचे चेहरे आता समोर येत आहेत. धनंजय मुंडे यांचा बळी गेला. जयकुमार रावल यांनी रावल को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोट्यवधि रुपयांचे घोटाळे करुन ठेवले आहेत. कुटुंबातले खोटे कर्जदार तयार करुन कोट्यवधी रुपये लाटले. हे प्रकरण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे. त्यांना मी विचारणार आहे की, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का? जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयांनी लाटली. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत यांची हिंमत गेली. हायकोर्टाने या लुटमारीवर आता ताशेरे ओढले आहेत. असे मंत्री या सरकारमध्ये आहेत. असे रावल एकटेच नाहीत. किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचे वातावरण खराब केलं आहे. अशा मंत्र्यांचे बळी जाणारच. हे बळी घेण्यासाठी भाजपचेच लोक आम्हाला हत्यारं पुरवत आहेत त्यांचा मी आभारी आहे असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Sanjay Raut : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण, कबर हटवण्याचा अध्यादेश काढण्याची हिंमत आहे का? संजय राऊतांचा थेट वार; म्हणाले,'विहिंप, बजरंग दल आरएसएसचे पिल्लं!