Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेना, आता अजितदादांच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले...
Nashik & Raigad Guardian Minister : महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अजूनही सुटलेला नाही. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Nashik & Raigad Guardian Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. या यादीत नाशिक जिल्ह्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला. तर नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे उद्या (दि. 12) रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं भाष्य केले आहे.
सुटेल, थोडासा धीर धरा
अजित पवार म्हणाले की, काळजी करू नका, जरी नाशिक आणि रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तिथलं जिल्हा नियोजनचे बजेट दिलेले आहे. निधी दिलेला आहे. दोन्ही ठिकाणी निधी वाढवण्यात आलेला आहे. 22 हजार कोटी रुपयांची सगळीकडे तरतूद करण्यात आली आहे. सुटेल, थोडासा धीर धरा, धीरे धीरे..., अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अमित शाह रायगडला असल्याने तटकरेंकडे जाणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, आम्ही अमित शाह यांना अशी विनंती केली होती की, आपण जर मुंबईत असाल तर माझ्याकडे आपण भोजनासाठी यावे आणि तुम्ही जर रायगडच्या परिसरात असाल तर सुनील तटकरे यांच्याकडे यावे. अमित शाह रायगडला असल्याने सुनील तटकरे यांच्याकडे जाणार आहेत. सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्या भागातले मंत्री म्हणून गोगावले साहेब, उदय सामंत यांना निमंत्रित केले आहे आणि भोजनाचा कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Nashik News : नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; बस जागीच पलटी, 14 जण जखमी























