Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर या जीआरवरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जण आपल्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडत असतो. माझ स्पष्ट मत आहे की, समाजा समाजात तेढ निर्माण करू नका. आपल्याला कुठल्याच घटकाला नाराज करायचं नाही. प्रत्येक जण सद्सद्विवेक बुद्धीला धरून बोलत असतो, असे त्यांनी म्हटले आहे.
कुणाच्याही तोंडातील घास काढून दिला जाणार नाही
मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, कुणाच्याही तोंडातील घास काढून दिला जाणार नाही. शेवटी कुठलाही निर्णय घेतला की, दोन मतप्रवाह असतात. ज्या दिवशी जीआर काढला त्या दिवशी एक चर्चा होती हळूहळू चर्चा बदलत गेली, असे त्यांनी म्हटले. हैदराबाद गॅझेटवरून बंजारा आणि वंजारी समाजात वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, एससी, एसटीमध्ये कोणत्या समाजाला घालायच आहे हा फक्त संसदेला अधिकार आहे. राज्य सरकारला नाही. एखाद्या समाजाचे राहणीमान, पुढारलेले लोक आहेत. दुसरीकडे गरीब देखील आहेत. त्यांच्यासाठी इडब्ल्यूस आरक्षण आणलेले आहे, असे त्यांनी म्हटले.
अडचणी मी फाईलवर ऑन रेकॉर्ड आणू शकतो
राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादीमय वातावरण होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही विदर्भात शिबिर घेतलं. कारण यापूर्वी आम्ही शिर्डी, रायगड इथे देखील शिबिर घेतलं होतं. विदर्भात 7 जागा होत्या. आमच्या 6 जागा जिंकून आल्या आहेत. 7 वी जागा मैत्रीपूर्ण करावी लागली. आम्हाला त्या जागेवर पराभव मिळाला. यंदा वेगळ्या प्रकारे शिबिर करत आहोत. भाषण नाही तर यंदा कृतीशील कार्यक्रम हाती घेऊन शिबिर पार पडत आहे. आज वेगवेगळे विषय घेऊन गट तयार केले आहे. त्यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून विषय येतील ते तळागाळातील प्रश्न असतील, जे माझ्याकडे येतील. मला अर्थमंत्री म्हणून काम करताना अडचण येणार नाही. या अडचणी मी फाईलवर ऑन रेकॉर्ड आणू शकतो. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळे प्रश्न आमच्या हातात येतील, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
