Ajit Pawar Death Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झाले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने देवळाली विधानसभा मतदारसंघात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सरोज अहिरे या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दादांची शेवटची सही सुद्धा स्मशानभूमीच्या कामासाठी होती, असे म्हणत त्यांनी काळीज पिळवटणारी कहाणी सांगितली आहे.
आमदार सरोज अहिरे भाषणात म्हणाल्या की, दादा गेले हे मन मानायला तयार नाही. ते आवाज देतील असे वाटते. आपल्याला मुंबईत बोलावतील, असे वाटते. माझ्यासारख्या सामान्य मुलीला त्यांनी आमदार केले. माझे वडील गेले त्यावेळी मी लहान होते. बाप वारले हे कळतही नव्हते. पण आता माझा दादा गेला. माझे आयुष्य घेतले असते तरीही चालले असते. पण, माझा दादा, शेतकऱ्यांचा नेता पाहिजे होता. त्यांनी घाणेरडे राजकारण कधीही केले नाही, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
Saroj Ahire on Ajit Pawar: शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली
सरोज अहिरे पुढे म्हणाल्या की, अजित दादांनी माझ्या मतदारसंघातील सय्यद पिंपरीच्या स्मशानभूमीच्या कामासाठी 1 कोटी रुपये मंजूर करत त्या फाईलवर शेवटची सही केली आणि दादा गेले. हे कसे विसरु? अश्रु कसे थांबतील? पक्षाचा आदेश आला आहे, त्यामुळे मला मुंबईला जावे लागत आहे, आम्ही सर्व आमदार पवार कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहू. माझा खूप मोठा आधार हरपला आहे. काम करत आलोय, काम करत राहू, ही दादांची शिकवण आहे. त्यानुसार काम करणार आहोत. दादा पुन्हा येतील, आमचे वाईट स्वप्न निघून जाईल असे वाटते. देवा जिथे कुठे असशील तर दादाला पुन्हा आण. माझे रक्ताचे नाते नव्हते. पण, त्यांनी मला खूप प्रेम दिले. शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली. मी आयुष्यभर कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी काळीज पिळवटणारी कहाणी त्यांनी यावेळी सांगितली.
इतर महत्त्वाच्या बातम्या