Aaditya Thackeray : सरकारच्या चहापानासाठी जाणं म्हणजे पाप, हे महायुती नव्हे 'महाझुटी' सरकार; आदित्य ठाकरे बरसले
Aaditya Thackeray : महायुती सरकारने बोलावलेल्या चहापानाचा कार्यक्रमावर महाविकास आघाडीकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Aaditya Thackeray : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session 2025) उद्या सोमवारपासून (दि. ३०) सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या शासकीय बंगल्यावर पार पडली. यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. सरकारच्या चहापानासाठी जाणं म्हणजे पाप आहे. कारण हे महायुती नाही तर महाझुटी सरकार आहे, असा हल्लाबोल ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या पूर्व संध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो. तसे पाहिले तर आम्ही विचार करत होतो की, सरकारच्या चहापानासाठी जाणं म्हणजे पाप आहे. कारण हे महायुती नाही तर महाझुटी सरकार आहे. एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे आपण पाहत आहोत. ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, तीन दिशेला तीन तोंडं आहेत. एकमेकांमध्ये भांडण सुरू आहे. मग ती बंगल्यांवरून असतील, गाड्यांवरून आहेत, कुठल्या जिल्ह्याचे कोण 'मालक'मंत्री होणार कोण पालकमंत्री होणार? इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की, माझा फंड यांनी चोरला, त्यांनी चोरला अशी परिस्थिती आहे. कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजून समन्वयाची गरज आहे.
दादा भुसे यांनी भ्रष्टाचार केला आहे का?
त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की, चहापानाच्या कार्यक्रमात किमान ते एकमेकांची तोंड तरी बघतील. डाग अच्छे है, अशी भाजपचे नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे डाग घेऊन अनेक लोक जे मंत्रिमंडळात बसले आहेत किंवा ते चहापानाला जातील, मुख्यमंत्र्यांना त्यांना पाहून आठवण येईल की यांच्यावरच मी आरोप केले होते. कोणाला जेलमध्ये टाकणार होते? कोणावर काय आरोप केले होते? कोणाच्या मागे ईडी लावली होती आणि हेच सगळे पाहत असताना भाजपच्या भ्रष्टाचारी सरकारमध्ये एक घोटाळा समोर येत आहे. 25 लाख विद्यार्थ्यांमधून अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. आम्ही आंदोलनाची हाक दिली होती, त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल. रात्री कळाल्यानंतर अनेक पालकांनी आम्हाला फोन केले. पहिली यादी जाहीर झाली, त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झाले आहेत. या यादीमध्ये कुठलं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे यांनी भ्रष्टाचार केला आहे का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय लादण्याची सक्ती केली आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
बळीराजाला फसवणारे लोक : विजय वडेट्टीवार
विजय वड्डेटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. बळीराजाला फसवणारे लोक आहेत. हे त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या बापाला पैसे दिले, कपड्याला पैसे दिले असं यांचे मंत्री राहिलेले बबनराव लोणीकर बोलतात. ज्या बळीराजाबाबत अशी वक्तव्य येत असतील त्यांच्या चहापानाला आम्ही जाणार नाही. त्यांच्या सरकारमध्ये पैसे दिल्याशिवाय, टक्केवारी दिल्याशिवाय कोणतीच कामे होतं नाहीत. सध्या कापसावर वाणी नावाची किड पडली आहे. मात्, त्यांच्या मदतीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महायुती सरकारमध्ये समन्वय नाही : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महायुती सरकारमध्ये समन्वय नाही. काळी पूजा येथे केली जाते. जिथे जाईल तिथे नगरसेवक फोडले जात आहेत. तीन ते चार कोटी रुपये यासाठी दिले जात आहेत. एका टेंडरसाठी ३-३ हजार कोटी रुपये खाल्ले जात आहेत. 12 कोटी जनतेचे पैसे खाणे यांनी सुरू केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. नांदेडमध्ये आठवड्याला खून होतोय. ठाणे येथील खुनाच प्रकरण आहे. पुरावे आहेत तरीदेखील कोणतीच कारवाई पोलीस करत नाहीत. लोणीकरांनी लोणी खाल्ल असेल महाराष्ट्राच्या जनतेने नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा






















