नवी दिल्ली : घाणीचं साम्राज्य असलेल्या वर्सोवा बीचला स्वच्छ करणाऱ्या अफरोज शहा यांची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी 'मन की बात'मधून व्यक्त केलं. त्यावेळी अफरोज शहा यांच्या कामाचं कौतुक करुन अशा व्यक्तींची देशाला जास्त गरज असल्याचं मोदींनी म्हणलं आहे.


याशिवाय, रॅन्समवेअर सायबर हल्ला, आंतरराष्ट्रीय योग दिवस आदींचा त्यांनी यावेळी आपल्या कार्यक्रमात उल्लेख केला. तसेच रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवाना शुभेच्छा देताना, रमजानचा पवित्र महिना शांतता आणि एकतेचा संदेश देत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी सर्व भारतीयांनी जगाला तीन पिढ्यांचं दर्शन द्यावं असं सांगितलं. तसेच या दिवशीचे फोटो #InternationalyogaDay, Narendra Modi App आणि MY Gov वर अपलोड करावेत असं आवाहनही त्यांनी केलं.

शिवाय स्वच्छतेसाठी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत मांडलं. तसेच सर्व देशवासियांना कचराकुंडीचा वापर करण्याचे आवाहन केलं. कचराकुंडीचा वापर वाढवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनी चार हजार शहरांमधील ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कचरा कुंड्या उपलब्ध असतील, असं सांगितलं.

विशेष म्हणजे, स्वच्छता अभियानात मुंबईतल्या वर्सोवामधील अफरोज शाहच्या कामाचा पंतप्रधान मोदींनी यावेळी विशेष उल्लेख केला. अफरोजच्या कामाचा आपल्याला अभिमान वाटतो. अफरोजसारख्या व्यक्तींची देशाला जास्त गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

याशिवाय जम्मू-काश्मीरमधील उच्चभ्रु वस्तीतील भाग हगणदारीमुक्त झाला ,याबद्दलही तेथील परिसरातील नागरिकांचं अभिनंदन केलं. या भागातील महिलांनी मशाल फेरी काढून घरोघरी जाऊन यासाठी नागरिकांना अभियानात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिलं.

दरम्यान, मोदी सरकारच्या कार्यकाळाची तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्याबद्दल, सध्या देशभरातील विविध प्रसार माध्यमांमधून जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर पंतप्रधानांनी विरोधकांना चिमटा काढत, त्यांच्या टीकेतूनही प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आभार मानले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आपल्या कार्यक्रमातूनही पंतप्रधानांनी सावरकरांना अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष दिला. त्याची अनुभूती आंदमानच्या सेल्यूलर जेलमध्ये गेल्याशिवाय होणार नाही, असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले.