Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने तात्काळ पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या शेती, जलविद्युत उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. पाकिस्तानच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याचा 80% हिस्सा या करारामुळे मिळत होता . त्यामुळे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाणी कोंडी झाली आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे.
भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर...
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणालेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतलाय आणि तेव्हापासून दररोज पाकिस्तानचा एक मंत्री बरळताना दिसतोय.
पाकिस्तान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करणार-
भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला असून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत बदला घेणार या भीतीने पाकिस्तानने याआधीच अरबी समुद्रात युद्धसराव सुरु केला आहे. शिवाय नियंत्रण रेषेवरही पाकच्या कुरापती सुरु असून सातत्याने शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं जात आहे. त्यातच आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करुन भारताला चिथावणी देण्याचा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न सुरु आहे.
भारतीय वायू दलाने दाखवली ताकद-
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायू दलाने आपली ताकद दाखवली. जोरदार वाऱ्यांमध्येही साडेतीन किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवर जॅग्वार, मिराज, राफेल, सुखोई, तेजससारख्या 15 लढाऊ विमानांनी 'टच अँड गो' केले. सर्वात आधी C-130J सुपर हर्क्यूलस विमानाने एक्सप्रेसवेवर 'टच अँड गो' केले. यानंतर, मिग, राफेल, सुखोई विमान एक्स्प्रेसवेवर झेपावताना पाहायला मिळाली. जवळपास दोन तास हा अभ्यास सुरू होता. याशिवाय एक्स्प्रेस वेवर रात्रीच्या वेळी सुद्धा हा लँडिंगचा सराव करण्यात आला. गंगा एक्सप्रेसवे हा देशातील चौथा एक्सप्रेसवे आहे, जिथे भारतीय वायू दलाच्या लढाऊ विमानांसाठी हवाई पट्टी आहे. याआधी उन्नावमधील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवे, सुलतानपूरमधील पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि इटावाजवळील बुंदेलखंड एक्सप्रेसवेचा, वायू दलाच्या लढाऊ विमानांसाठी रनवे म्हणून यशस्वीरित्या वापर करण्यात आलाय. पण उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवे हा देशातील पहिला असा मार्ग आहे जिथे, वायू दलाची लढाऊ विमानं रात्रीही उतरू शकतात.