Osmanabad Renamed Dharashiv : औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या राज्याच्या प्रस्तावास आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गृहमंत्रालयाने अधिकृत परिपत्रक जारी करत मान्यता दिली आहे.  उस्मानाबादचे नामांतर आज धाराशिव झाले असले, तरी शिवसेनेची ही मागणी तब्बल 25 वर्षांपूर्वीची आहे. 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची प्रथम घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. त्यानंतर युतीच्या काळात औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते.  


उस्मानाबादचे मुळचे नावच धाराशिव आहे. धाराशिव हे नाव 1927 पर्यंत प्रचलित होते. उस्मानाबाद शिवाय एदलाबादचे मुक्ताईनगर...अंबोजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबाजोगाई असे नामांतर काँग्रेसच्या काळात झाले आहे, तीही ही नावे ऐतिहासिक होती म्हणून. औरंगाबाद हे मलिक अंबरने वसविलेले शहर आहे. त्या शहराच्या नामांतराची सेनेची भूमिका राजकीय आहे. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतीक नावे आहे, असे इतिहासाचे अभ्यासक जयराज खोचरे सांगतात. 


उस्मानाबाद की धाराशिव? इतिहास काय सांगतो 


निजामाने मराठवाड्यातील अनेक शहरांची नामांतरे केली होती. त्यामध्ये उस्मनाबाद या शहराचाही समावेश आहे. उस्मानाबादचं जुनं नाव धाराशिव असंच  होतं. ग्रामदैवत असलेल्या धारासुर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असल्याचे पुरावे सापडतात. पण निजामशाही मधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही संदर्भ आढळतात. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन 1900 साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे.


1995 च्या युती सरकारनेच घेतला होता निर्णय -


शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये उस्मानाबाद नाव कधीच लिहण्यात येत नाही, त्याचा उल्लेख नेहमीच धाराशिव असा केला जातो. त्याच प्रमाणे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. 2019 मध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकवेळा त्यांच्या सोशल हँडलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर तर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. मराठवाड्यातील अंबाजोगाईचं नाव निजामकाळात मोमिनाबाद होतं, पण तेही नंतर बदललं... आता ते अंबाजोगाई असं रुळलं आहे. 1997 मध्ये जळगावातील एदलाबादचे नामांतर मुक्ताईनगर करण्यात आले होते. 


उस्मानाबादचं पुन्हा एकदा धाराशिव करण्याची घोषणा सर्वात आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तुळजापूर येथील शिवसेनेच्या महिला मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या नामांतराची घोषणा केलेली.  त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली. तसंच, 1998 मध्ये युतीच्या (शिवसेना-भाजप ) सरकारने धाराशिव नामांतराबाबत सूचन आणि हरकती मागवल्या होत्या. त्यापूर्वीच दोन मुस्लीम शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती.  त्यानंतर सन २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचं नामांतर धाराशिव हा निर्णय रद्द केला होता अन् औरंगाबाद खंडपीठात तसे कळवून याचिका निकाली काढली होती. आता तब्बल 25 वर्षानंतर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आले आहे. याला केंद्राची परवानगीही मिळाली आहे. 


आणखी वाचा :


Aurangabad Renamed : खडकी ते औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर, काय आहे नावाचा इतिहास?


Osmanabad Dharashiv : उस्मानाबादचं नामांतर झालेल्या 'धाराशिव'चा वैभवशाली इतिहास! रोम, आफ्रिका देशातील लोकांचे होते वास्तव्य