Beed News : राज्यभर ओबीसी प्रश्नावर रान पेटवणाऱ्या आणि ओबीसी जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असणाऱ्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)  यांना आज बीडमध्ये (Beed News) होणाऱ्या मेळाव्यातून वगळल्याने राज्यातील ओबीसी नेत्यांना हाकेंचे वावडे वाटू लागले का? अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या लक्ष्मण हाके यांना मराठवाड्यातून उदंड प्रतिसाद मिळत होता. यातूनच हाके हे ओबीसीचे ब्रँड नेते बनू लागल्याचे चित्र तयार होत असताना आज बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होत असणाऱ्या महाएल्गार मेळाव्यासाठी हाकेंना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यामुळे ओबीसी नेत्यातील फूट आता राज्याच्या समोर येऊ लागली आहे. अशातच आता या महाएल्गार सभेमधून हाके यांना वगळल्याने ओबीसी नेत्यातील मतभेद समोर आले आहेत.

Continues below advertisement

बीड येथे समता परिषदेच्या वतीने महाएल्गार सभेचे आयोजन

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज बीड येथे दुपारी चार वाजता महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. मात्र यामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभर मोर्चे, सभा आणि आंदोलने करणारे लक्ष्मण हाके यांना मात्र या कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमात या कार्यक्रमाच्या पोस्टर बाहेर पडल्यावर ही गोष्ट समोर आली आहे. यामुळे ओबीसी जनतेत लोकप्रिय होऊ लागलेले लक्ष्मण हाके यांचे बड्या ओबीसी नेत्यांना वावडे आहे का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मधमाशांनी हल्ला

जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मधमाशांनी हल्ला केला. अंतवल्ली कराड येथील सरपंचांच्या शेतात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यातील काही निवडक आंदोलक समन्वयक या बैठकीसाठी उपस्थित होते. बैठक सुरळीत सुरू असतानाच अचानक मधमाशांचे मोहोळ उठले आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे बैठकीच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक आंदोलकांना मधमाशांनी चावा घेतला, काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना समन्वयकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे ते सुरक्षित आहेत. आता ही बैठक अंतवल्ली कराड गावामध्ये दुसरीकडे घेण्याची शक्यता आहे. कालपासून या बैठकीची तयारी सुरू होती. या घटनेमुळे बैठकीत मोठा गोंधळ उडाला होता.

Continues below advertisement

हेही वाचा