Maharashtra Bhushan Award Ceremony :  महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्यांनी प्राण गमावले. यानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. पुरस्कार सोहळ्याच्या स्थळ आणि वेळेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर करुन जितेंद आव्हाड यांनी लिहिलं आहे की, "हे कालचे सत्य ,.. अप्पांचे भक्त उन्हात … आणि आप्पांमुळे मत मिळतील ते सावलीत.." "जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते? हा कार्यक्रम संध्याकाळी देखील घेता आला असता. भरदुपारी सूर्य माथ्यावर असताना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती?" असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत.


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?


"काल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले. खरतरं 'भारतरत्न'सारखा पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जातो. पण, संपूर्ण जगभर त्याचे प्रक्षेपण केले जाते. हा कार्यक्रम देखील त्यापद्धतीने करता आला असता. ह्या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असं दाखवायचं हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होतं.


स्वत: सरकारतर्फे आव्हान केले जाते की, काम नसेल तर उन्हामध्ये जाऊ नका आणि इथे मात्र सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावलं होतं. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही. प्रचंड ऊन. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते.


त्यामुळे आता भाविकांच्या मनात प्रचंड राग आहे. मतांच्या राजकारणासाठी एका संताचा वापर होऊन त्या संतांच्या भाविकांचा मृत्यू होणे हे त्या संतांना मानणा-या कुटुंबापैकी कोणालाच आवडणारे नाही. किंबहुना माझे तर असे मत आहे की, हे संतांनाही आवडलं नसेल. त्या वादात मला पडायचं नाही. पण, ह्या मृत्यूची जबाबदारी कोणालातरी घ्यावीच लागेल. जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का ? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते ? हा कार्यक्रम संध्याकाळी देखिल घेता आला असता. भरदुपारी सुर्य माथ्यावर असतांना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती ?


संतांचा आणि धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. आणि नंतर मतं आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे.... यापुढे देखिल येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची?






आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारने सन्मान


ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमसाठी राज्यभरातून आलेला जनसमुदाय हा सकाळी 8 दुपारी 2 वाजेपर्यंत कडक उन्हात बसला होता. पाच ते सहा तासांच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.


उष्माघातामुळे 12 जणांचा मृत्यू


महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उष्माघातामुळे 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला झाला आहे. विनायक हळदणकर (वय 55 वर्षे, रा. कल्याण) असं मृताचं नाव आहे. त्यांच्यावर नवी मुंबई पालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, एमजीएम रुग्णालयात 15 जणांवर उपचार सुरु असून त्यापैकी 2 जण गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.