Nashik News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे घरातील स्लॅप कोसळल्यानं आजी आणि नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे. मालेगाव शहर व परिसरात पावसाची संततधारसुरु आहे. या पावसामुळं घराचा स्लॅब कोसळल्याने आजी विमलबाई पंढरीनाथ येवले ( वय वर्ष 80 ) व नातू चेतन रामचंद्र येवले ( वय वर्ष 20 ) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. 

Continues below advertisement

परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू करुन घरातील इतर सदस्यांना बाहेर काढलं

येवले कुटुंबीयांत एकूण 5 जण कुटुंबात राहत होते. घटनेनंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू करुन घरातील इतर सदस्यांना बाहेर काढलं आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

सप्तश्रृंगी गड घाटात दरड कोसळली, सुदैवाने कुठलीही दुर्घटना नाही

पावसाच्या संततधारेमुळं नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात रस्त्याच्या मध्यभागी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने कुठलीही दुर्घटना अथवा जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक व प्रशासनाने मदतकार्य राबवून दरडीचा मलबा बाजूला हटवून तत्काळ वाहतूक सुरळीत केली..

Continues below advertisement

रायगडमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना, मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू

रायगडमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अलिबाग नागोठणे मार्गावर टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली आहे.  अपघातात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  नागोठणे आणि अलिबागड मार्गावरील रिलायन्स कंपनी शेजारी हा अपघात घडला आहे. नागोठणे पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

3 ते 7 जुलैदरम्यान राज्यभर पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातही 3 ते 7 जुलैदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान ऑफ-शोअर ट्रफ सक्रिय आहे. 

नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं 

वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. ते पुढील दोन दिवसांत अधिक प्रभावी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन हवामान विभागानं केलं आहे.