Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Nashik News: नाशिकच्या सटाणा तालूक्यात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गावात 'भूत ' असल्याची अफवा पसरल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरले आहे.

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आराई गावात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘गावात भूत फिरत आहे’ अशा अफवा जोर धरू लागल्या असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आराई गावात भुताचा वावर असल्याचे संदेश, फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या संदेशांमध्ये कधी गावाच्या हद्दीत, कधी मोकळ्या जागेत तर कधी निर्मनुष्य भागात भूत दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या पोस्ट्स आणि व्हिडीओंमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिक रात्री घराबाहेर पडण्यासही घाबरू लागले होते. या अफवांनंतर गावातील काही तरुणांनी तसेच पोलीस प्रशासनानेही परिस्थितीची गंभीर दखल घेत रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास सुरुवात केली. संभाव्य ठिकाणी तपासणी करण्यात आली, मात्र कुठेही संशयास्पद हालचाल किंवा भूत असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. यानंतर हळूहळू ही बाब अफवाच असल्याचे स्पष्ट होऊ लागले.
Nashik News: कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा
दरम्यान, गावात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवून गावात भीती निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अशा खोट्या संदेशांवर आणि व्हिडीओंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
Nashik News: एआयद्वारे फोटो,व्हिडीओ तयार केल्याचा संशय
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ हे जुने असून काही फोटो एआय (Artificial Intelligence) च्या माध्यमातून तयार करून पसरविण्यात आल्याचा संशय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत असलेला तथाकथित ‘भुताचा व्हिडीओ’ पूर्णपणे असत्य आणि दिशाभूल करणारा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलाही संशयास्पद मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये. अशा प्रकारच्या अफवा समाजात भीती पसरवण्यास कारणीभूत ठरतात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























