नाशिक : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारून आरपारची लढाई सुरु केलेल्या आणि आठवडाभरापासून राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरंगे-पाटील यांनी आज (22 नोव्हेंबर) बुधवारी नाशिकमध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सहभागाबद्दल महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. 24 डिसेंबरपूर्वी सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार असल्याने आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात असल्याचा दावाही त्यांनी केला.  


महाराष्ट्र सदन इमारतीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत अनियमितता


मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता (श्रManoj Jarange Patil on Chhagan Bhujbal) सडकून टीका केली. भुजबळांचे नाव न घेता ते म्हणाले की, "तु कुठं भाजी विकायचा, कोणाचे बंगले बळकावले, मुंबईत तुम्ही काय केले, कोणत्या चित्रपटात आणि नाटकात काम केले हे मला माहीत आहे.  2016 मध्ये ज्या घोटाळ्यात भुजबळांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी घोषित केले होते. त्या घोटाळ्याचा संदर्भ देत जरंगे-पाटील म्हणाले की, लोकांच्या पैशाची लूट झाली आणि “म्हणून तुम्हाला (भुजबळ) तुरुंगवास भोगावा लागला”. 2011 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत अनियमितता झाली होती.


तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचं नाव का नाही? 


अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत छगन भुजबळ टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही बाजू घेत समर्थन नसल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी नाशिकमध्येच भुजबळांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, म्हाताऱ्या माणसाने आता बोलू नये, जास्त बोलू नये, पाणी कमी पडू शकते. आता नाही, आरक्षण मिळू द्या मग बघतो. यांचं आपल्याला सगळं माहिती आहे आड येऊ नको. तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचे नाव का नाही? असा सवाल करत त्यांनी भुजबळांना नाशिकमध्येच घेरले. 


सरकारला सांगतो यांना आवरा, जातीयवाद पसरवत आहेत


त्यांनी सांगितले की, मराठे दंड थोपटल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारला सांगतो यांना आवरा. जातीयवाद पसरवत आहेत. नाही, तर मग मी पण आता मागे हटणार नाही. सरकारला विनंती करतो ते जातीय तेढ निर्माण करत आहेत त्यांना रोखा. आम्ही शांततेत जात आहोत, शांतता राखण्याच काम सरकारचं आहे. पण सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे. आम्ही शांततेचं आवाहन करत आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगत आहे. 


आरक्षण मी छताड्यावर बसून घेतो


पोलीस भरती करायची असेन तर आमची जागा सोडा, महाराष्ट्रातील आंमच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्या, आरक्षण दिले नाही तर कोटी मराठे आंदोलनाला सज्ज आहेत. नाशिकच्या पवित्र भूमीतून आवाहन करतोय, सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी मराठा लेकरांच्या पाठीशी उभे रहा, नाहीतर तुम्हाला लक्षात ठेवतील असा इशारा त्यांनी दिला. मला सगळे शत्रू मानतात, पण मी त्यांना घाबरत नाही, मराठा नेत्यांना पण नाही. फक्त तुम्ही शांत रहा, आरक्षण मी छताड्यावर बसून घेतो, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.  मंगळवारी ठाण्यातील सभेत जरंगे-पाटील म्हणाले होते की, आतापर्यंत आपण भुजबळांना वैयक्तिक लक्ष्य केले नव्हते. मराठा आरक्षणासाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने आता मी त्याला विरोध करणार आहे, असे ते म्हणाले. गेल्या आठवड्यात जालन्यातील अंबड येथे झालेल्या सभेत भुजबळ यांनी जरंगे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या