Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळा सोमवारी पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा ओघ सुरु असून सलग दोन वर्षे विठुरायाच्या दर्शनाला पारखा झालेला वारकरी मोठ्या ओढीने पंढरपूरला जाण्यासाठी त्रंबक नगरीत दाखल होत आहे. त्याचबरोबर त्र्यंबक (Trimbakeshwer) नगरीतील संत निवृत्तीनाथ मंदिर (sant Nivruttinath Mandir) समितीने पालखी सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  


दोन वर्षांच्या खंडानंतर आता संत निवृत्तीनाथ पालखी (Sant Nivruttinath Palkhi) यंदा विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे. यासाठी संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी 13 जूनला म्हणजेच सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 21 जूनला तर संत तुकारामांच्या पालखीचे प्रस्थान 20 जूनला होणार आहे. मुखी हरिनामाचा गाजर, हाती टाळ मृदूंग घेत लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जात असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका पिढ्यान्-पिढ्या सुरू असलेल्या वारीला सुद्धा बसला. अन दोन वर्ष वारकरी आणि विठ्ठलाची भेटच झाली नाही. वारीवर या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण आता सर्व वारक-यांना विठ्ठलाची भेट घेता येणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे पाहता येणार आहे. 


त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी नित्यनेमाने पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जात असते. दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदाच्या वारीसाठी भाविक भक्त उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर संत निवृत्तिनाथ महाराज त्र्यंबकेश्वर येथे परभणी, बीड, औरंगाबाद, जालनासह मराठवाड्यातून असंख्य वारकरी खाजगी वाहनाने त्रंबकमध्ये दाखल झाले आहेत. त्यातील काही पायी दिंडीत सहभागी होतील तर बहुतांश वारकरी भक्त नाथांच्या पालखीला निरोप देण्यासाठी येत आहेत. 


दरवर्षीप्रमाणे 26 मुक्काम होणार आहेत 27 व्या दिवशी पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. पालखीचा मार्ग पूर्वी जात असून शुक्रवार 24 जून अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. 25 जून रोजी ज्येष्ठ वद्य द्वादशी आहे. त्या दिवशी संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा नगर मुक्कामी होणार आहे. एक जुलै रोजी कर्जत जवळ धांडे वस्ती येथे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर शनिवारी 9 जुलै रोजी वाखरी सोहळा संपन्न होईल. हे ते सर्व संतांच्या दिंड्या एकत्र येतील.  त्यानंतर पंढरपूर प्रवेश सोहळा सुरू होणार आहे. रविवारी 10 जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रा उत्सव आहे. पालखी मुक्काम आषाढ पौर्णिमा 13 जुलैपर्यंत पंढरपुरातच असेल. 


असा होतो प्रवास 
दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रका प्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. या दरम्यान चार मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. 18 दिवसांचा पायी प्रवास करून 30 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल. त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर.असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.