Nashik Snakebite : पावसाळा म्हटला कि सर्प बाहेर येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सर्पदंशाच्या (Snakebite) घटनाही समोर येतात. नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील सहा महिन्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक त्र्यंबक (Trimbakeshwer), पेठ सारख्या आदिवासी पट्ट्यात सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. 


सध्या पावसाळा (Heavy Rain) सुरु असल्याने सर्प बिळामधून बाहेर येण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर, झाडा झुडपात, गोठ्यात आदी ठिकाणी सर्प दिसू लागले आहेत. अशातच सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात तीनशेच्या वर नागरिकांना सर्प दंश झाला आहे. जवळपास प्रत्येक महिन्यात थोड्या अधिक फरकाने सर्पदंश झालेले रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये जानेवारीपासून ते जून महिन्यापर्यंत आकडेवारी वाढलेली दिसून येते. 


दरम्यान पावसाळ्यामध्ये बिळांमध्ये पाणी शिरल्याने ओलावा निर्माण होतो. त्यामुळे उबदार जागेच्या शोधार्थ सर्प बाहेर पडतात. त्यामुळे या दिवसात साप दृष्टीत पडतात. त्यातून साहजिक सर्पदंशाचे प्रकार देखील वाढतात. यंदाही जानेवारी ते एप्रिल या कालावधीच्या तुलनेत मे आणि जून महिन्यात जिल्हा रुग्णालयात सर्पदंशाचे उपचारार्थी जवळपास अडीच पटीने वाढले आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे सापांचे बाहेर पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. बिळांमध्ये पाणी शिरल्याने अडगळीच्या विसाव्याला असलेले सर्प बिळांमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे सर्पमित्रांना पकडण्यासाठी बोलवण्याचे प्रमाणही वाढले आहे. 


आदिवासी पट्ट्यात सर्वाधिक घटना 


नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) आदिवासी पट्टा व डोंगराळ भाग म्हणून ओळख असलेल्या पेठ सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आदी भागांत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात अशी माहिती जिल्हा रुग्णालय आकडेवारीवरून दिसून येत आहे. डोंगराळ भाग असल्याने सर्प अधिक दिसून येतात. शिवाय शेती काम करताना सर्पदंश झाल्याच्या घटना अधिक दाखल होतात. शिवाय आदिवासी पट्ट्यातील घरे पावसाळ्यात झाड पालाच्या ताट्यांनी झाकलेल्या असतात. अशावेळी सरपण लपण्यासाठी उबदार जागा सापडते. तसेच जोरदार पावसामुळे कधी कधी विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिक बाहेर पडतात. त्यावेळी अंधारात सर्प दशांच्या घटना घडतात. सर्पदंशाच्या घटना अधिक असल्याने मृत्यू देखील याच परिसरात अधिक आहे. 


सहा महिन्यात घडलेल्या घटना 
दरम्यान जानेवारीपासून ते जून पर्यंतचा आकडेवारी पाहता सर्वाधिक सर्पदंश जून महिन्यात झालेले दिसून येतात. आकडेवारीनुसार जानेवारीत 38 रुग्ण,  फेब्रुवारी 42 रुग्ण, मार्चमध्ये सात रुग्ण, एप्रिलमध्ये 56 रुग्ण, मे मध्ये 64 रुग्ण, जून मध्ये सर्वाधिक 115 रुग्ण तर दोन जणांचा मृत्यू तर मे मध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे अशी एकूण सहा महिन्यात 322 सर्पदंशाच्या घटना घडल्या असून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 


ठोस उपचार पद्धती 
सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ प्रथमोचार आणि त्यांनतर रुग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर सापाच्या प्रजातीवरून रुग्णाला किती धोका आहे, हे ठरविले जाते. त्यानंतर योग्य तो उपचार केला जातो. मात्र ग्रामीण भागात अद्यापही यावर ठोस उपचार पद्धती नसल्याने रुग्ण दगावतो. ग्रामीण भागात वाहनांची सुविधा, रस्ते, आरोग्य असुविधांमुळे रुग्ण वेळेवर पोहचत नाही. शिवाय स्थानिक पातळीवर योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. 


गोल्डन अवर्स किती महत्त्वाचे?
दरम्यान जुन ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाचे रुग्ण आढळतात. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी अत्यंत कमी सर्पदंश झालेले रुग्ण आढळले होते आणि त्यातून अनेक मृत्यू होतात. सर्पदंश झाल्यावर रुग्ण खूप घाबरलेला असतो, त्याला विषारी बिनविषारी सापाविषयी माहिती नसते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याबाबतचे व्यवस्थापन करताना रुग्णाचे गोल्डन अवर्स किती महत्त्वाचे असतात हे ओळखून उपचार करणे गरजेचे असते. यासाठी समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. शाळेतल्या मुलांच्या सहभाग पण यामध्ये चांगल्याप्रकारे होऊ शकतो .