नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबतचा (Mahayuti Seat Sharing) फॉर्म्युलाच 'एएनआय'शी बोलताना सांगून टाकला आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  


येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 


प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील 


महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


जनसन्मान यात्रेबाबत काय म्हणाले अजित पवार? 


अजित पवारांची नाशिमधून आज जनसन्मान यात्रा सुरु होत आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जनसमान यात्रा सुरू केली आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहि‍णींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. काल अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले. 


आम्हाला कुणालाही नाराज करायचे नाही


महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा नवा अजेंडा तयार केला जात आहे का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, त्यांना जी भूमिका मांडायची आहे ती भूमिका ते मांडू शकतात. आम्हाला जे सांगायचे आहे ते आम्ही सांगू इच्छितो. आम्हाला कुणालाही नाराज करायचे नाही. सर्व घटकांना आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे, असे त्यांनी म्हटले.  


इतरांवर अन्याय होता कामा नये


मराठा आरक्षणावरून राजकारण कधी थांबेल? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला जी भूमिका योग्य वाटत आहे ते भूमिका ते मांडत आहे. त्याबद्दल कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. अनेकदा सभागृहात देखील एकमताने याबाबतचे निर्णय झाले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. वेळोवेळी निर्णय घेतले होते. काही निर्णय दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाही. काही निर्णय हायकोर्टात टिकले मात्र सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आमचा हाच प्रयत्न आहे की, जे काही द्यायचे आहे ते देत असताना ते समाजाला मिळाले पाहिजे. इतरांवर कुठलाही अन्याय होता कामा नये, या पद्धतीने आमचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी : नाशिकमधील शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांच्या गळाला? जनसन्मान यात्रा सुरु होताच मोठा गेम