तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला असून मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नांदेड : महाराष्ट्रातील सनदी अधिकारी आणि नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरुन बदली (Transfer) करण्यात आलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगानी आज नांदेडच्या (nanded) जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सूरू केल्याचं पाहायला मिळालं. तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून निघाला होता. विशेष म्हणजे तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर मुंबईतील मंत्रालय परिसरात देखील दिव्यांग बांधवांनी आंदोलन करत बदली रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली होती.
राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला असून मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, गेल्याच आठवड्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून काहींना महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टींग करण्यात आली असून काहींना महामंडळ व प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर धडाडीचे आयएएसस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांग विभागाचे सचिव असताना दिव्यांगांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांनी त्यांच्यापदी आदर व्यक्त करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. यापूर्वी, मंत्रालय परिसरात दिव्यांग बांधव या मागणीसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, आज नांदेडमध्ये तुकाराम मुंढेंची बदली रद्द करावी, अशी मागणी करत दिव्यांग बांधव एकत्र आले होते.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीवेळी दिव्यांग बांधव कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीवरून आक्रमक झाल्याचं दिसून आले. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
तुकाराम मुंढेंच्या आईचे निधन
दरम्यान, तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यामुळे, सध्या ते आपल्या मूळ गावी असून दोनच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या त्यांच्या मूळगावी आईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच, तिसऱ्या दिवशीच आईच्या अस्थींचे विसर्जन करता त्यांनी वृक्षारोपण करुन पर्यावरण आणि विवेक विचाराचा संदेश समाजाला दिला. दरम्यान, अद्याप त्यांनी नवीन बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारला नाही.
हेही वाचा
धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस






















