मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 20 आणि 21 फेब्रुवारीलाकाही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच भागात या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागातही वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करुन शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळं मैदान, झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणं टाळावं, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.