HSC paper leak:नागपूरमध्ये बारावी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे समोर आल्याने हे प्रकरण केवळ अपघाती नसून संघटित रॅकेट असल्याचा संशय बळावला आहे.

Continues below advertisement

HSC paper leak: गुन्हा दाखल झाल्यानंतरही गणिताचा पेपर लीक

16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 तारखेला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अटकेतील आरोपींनी आपले मोबाईल फॉरमॅट केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांनी डिलिट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर केला असता 21 फेब्रुवारीला गणिताचा तिसरा पेपरही प्रसारित झाल्याचे डिजिटल पुरावे समोर आले. विशेष म्हणजे, सेंट उर्सुला शाळेतील एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर प्रसारित झाल्याचे आधीच उघड झाले होते. आता गणिताचा पेपरही त्याच साखळीतून बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

HSC paper leak: मुख्य सूत्रधार फरार

या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून याला अटक करण्यात आली आहे. तसेच एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान आणि जुनेद जावेद यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याला जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला पाचवा आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक कार्यरत आहे.

Continues below advertisement

HSC paper leak: सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही परीक्षा केंद्रांवर विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात पोहोचल्याची तक्रार पर्यवेक्षकांनी केली आहे. 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिका मिळाल्याचे निदर्शनास आले. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजीच्या पेपरसंदर्भात ही बाब घडल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रेसमधून सीलबंद पाकिटे थेट परीक्षा केंद्रांवर पाठवली जात असताना लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका कशा गायब झाल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यवेक्षकांनी केंद्रप्रमुखांमार्फत बोर्ड अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असून, बोर्डाने तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

HSC paper leak: दोन्ही घटनांमध्ये संबंध?

पेपरफुटी प्रकरणात चार जणांना अटक झाली असून काही महाविद्यालयांशी टायअप असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा प्रकार आणि डिजिटल माध्यमातून पेपर प्रसारित होण्याच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. रसायन, भौतिकशास्त्र आणि गणित या तिन्ही विषयांचे पेपर फुटल्याने बारावी परीक्षेच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य सूत्रधार सापडल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.

आणखी वाचा 

Ritu Tawde Rolex Watch: रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण म्हणाल्या, 'ते घड्याळ...'