नागपूर: राष्ट्रीय सणांच्या व इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज मैदानात व रस्त्यांवर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने एका जनहीत याचिकेवर निर्णय देतांना प्लास्टीक  व  कागदी  राष्ट्रध्वज वापरावर बंदीचे निर्णय दिले आहेत. त्यानुषंगाने  नागरिक व विद्यार्थ्यांनी कागदी व प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.


शासनाच्या 1 जानेवारी 2015 च्या शासन निर्णयानूसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. 


विल्हेवाट लावण्यासाठी हे करा


खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सुर्यादयापूर्वी, जिल्हाधिकारी किंवा तहसिल कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट्र करण्यात यावेत. तसे करतांना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरी विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 


सामाजिक न्याय विभागातर्फे बाईक रॅली


नागपूर: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, 'हरघर तिरंगा' या उपक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथून ते संविधान चौकपर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करून करण्यात आले आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर बाईक रॅलीस संबोधन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथून बाईक रॅलीचा प्रारंभ होऊन संविधान चौक येथे समारोप होईल. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येईल. मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे व सर्वांनी उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.


Maharashtra Startup : महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची अंमलबजावणी सुक्ष्म व योग्य नियोजनाद्वारे करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना