नागपूर : अजित पवारांच्या अपघाताबद्दल फक्त आम्हालाच नव्हे तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, आमदारांनाही शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली. नितीन गडकरींनीही छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नये असं मी त्यांना सांगणार असल्याचंही देशमुख म्हणाले.
धुकं असतं तर व्हिडीओ समोर आला असता का?
अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीला येत असताना अपघात झाला. बारामती विमानतळावर त्यावेळी धुकं असल्याने पायलटला धावपट्टी दिसली नसल्याचं सांगितलं जातंय. मात्र नेमक्या याच गोष्टीवरून अनिल देशमुखांनी शंका उपस्थित केल्याचं दिसून येतंय.
अनिल देशमुख म्हणाले की, "बारामतीच्या एअरपोर्टवर धुकं असल्याने हा अपघात झाल्याचं आधी सांगण्यात आलं. पण ते विमान हवेत असतानाच तिरके झाले आणि हा अपघात झाला, त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ खूप लांबून काढण्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळे जर धुकं असतं तर हा व्हिडीओ काढता येणं शक्य होतं का?"
या घटनेची केवळ डीजीसीएकडूनच नव्हे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली वेगळी चौकशी झाली पाहिजे. त्याचवेळी सत्य समोर येईल अशी मागणी अनिल देशमुखांनी केली.
नितीन गडकरींना सांगणार...
अजित पवारांचा झालेला अपघात हा संशयास्पद असल्याचं मत अनिल देशमुखांनी व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले तर तुम्ही छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका असं मी त्यांना सांगणार असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलं.
विलिनीकरणाच्या चर्चेची माहिती समोर आणणार
एकीकडे शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचवेळी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांकडून मात्र तो दावा खोडून काढण्यात येत आहे. त्यावरही अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली.
अनिल देशमुख म्हणाले की, "दुखवटा संपल्यानंतर आम्ही याबाबतची सविस्तर माहिती जाहीर करू. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या 14 बैठका झाल्या. त्यापैकी काही बैठकींना मी देखील होतो. या बैठकींना कोण-कोण उपस्थित होतं, त्यामध्ये काय ठरलं यासह अनेक सविस्तर गोष्टी आम्ही जाहीर करू."
ही बातमी वाचा:
