मुंबई : इमारतीच्या टेरेसवर जाऊ न दिल्याच्या रागात एका तरुणाने त्या इमारतीच्या पार्किंगमधील पाच दुचाकी जाळल्याची दुर्घटना भिवंडी येथे घडली आहे. याप्रकरणी एका माथेफिरु तरुणाला अटक करण्यात आली आहे. आवेस शेख (21) असे या तरुणाचे नाव असून तो भिवंडी शहरातील पिराणी पाडा या परिसरातल्या रेहमत कॉम्प्लेक्स इमारतीचाजवळ राहतो.


रेहमत कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेले काही गर्दुल्ले कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये जाऊन नेहमी नशापान करतात. तसेच इमारतीच्या टेरेसवर जाऊन त्या ठिकाणी मुलींची छेड काढतात. रात्री टेरेसवर मद्यपान करतात. त्यामुळे इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने आवेश शेखला इमारतीच्या टेरेसवर जाण्यास रोखले होते.

आवेशला टेरेसवर जाण्यास रोखल्यामुळे दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. या भांडणाचा राग धरुन आवेशने कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधील दुचाकींना आग लावली. या आगीत पाच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आग पाहून स्थानिकांनी पार्किंगमध्ये धाव घेतली व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी भिवंडीतल्या शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आवेश शेख या माथेफिरुला अटक करण्यात आली आहे. आवेशने लावलेल्या आगीमुळे तब्बल दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.