मुंबई : गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची शक्यता वर्तवली जात  आहे. अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. उच्च न्यायालयालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी म्हणून स्वत:हून पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी ते काही मोठ्या व्यक्ती आणि वकिलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.


गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख नागपूरला रवाना होतील असं बोललं जात होतं. मात्र ते थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लील एका मोठ्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्या संदर्भात अतिशय गुप्तता त्यांच्या कार्यालयकडून ठेवण्यात आली आहे. राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख अद्याप मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या भेटीनंतर अनिल देशमुखांची नेमकी भूमिका काय आहे हे सर्वांसमोर येईल. 


नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख


अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. त्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे. 






Maharashtra New Home Minister: दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?


गृहमंत्र्यांचा राजीनामा महाविकास आघाडी सरकार पारदर्शक  असल्याचा पुरावा - बच्चू कडू


गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकार पारदर्शक  असल्याचा पुरावा असल्याचं  राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा त्यांच्यावरील लावलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शी व्हावी यासाठी दिला आहे. तर विदर्भातील मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे का?  या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी यात कोणताही प्रांतवाद दिसत नसल्याचं म्हटलंय. 


आमदार रवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा


आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने नैतिक जबाबदारी दाखवत राजीनामा दिला, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा.आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे आता दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.