मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहारातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांचा तपस यंत्रणेच्या ताब्यातील मुक्काम वाढला आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना 1 मेपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास यंत्रणेनं दोघांची कोठडी संपत असल्यानं त्यांना बुधवारी पुन्हा कोर्टात हजर केलं होतं. याच प्रकरणात जामीनावर असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विशेष परवानगी काढत महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास केल्यामुळे वाधवान नव्यानं वादात अडकले होते.


कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयानं वाधवान यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर देशभरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असतानाही जामिनावर असलेले उद्योगपती कपिल वाधवान, त्यांचे कुटुंबीय आणि नोकरचाकर अशा एकूण 23 जणांनी 8 आणि 9 एप्रिलला पाच गाड्यातून राज्यांतर्गत प्रवास केला. विशेष म्हणजे या प्रवासासाठी त्यांना राज्याच्या गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्यांना स्वत:च्या लेटरहेडवर पत्र दिले होते. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी वाधवान यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.


साताऱ्यात पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तिथं 15 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं. हा कालावधी पुर्ण झाल्यानंतर सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून सीबीआयनं त्यांना त्यांच्याकडील दाखल गुन्ह्यात ताब्यात घेतले. येस बँकेच्या 37 हजार कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियाच्या परदेशातील बँक खात्यावर 600 कोटींची लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्याविरोधात सीबीआयनं 7 मार्चला गुन्हा दाखल केला आहे.


Anil Deshmukh on #Wadhwan | अमिताभ गुप्तांवर पत्र देण्यामागे कुणाचाही दबाव नव्हता - गृहमंत्री