मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळेच यंदाच्या निकालांची परिस्थिती सगळ्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे खरमरीत ताशेरे मुंबई हायकोर्टानं ओढले आहेत.


विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईविरोधात विधी(लॉ) विभागाच्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टानं हे ताशेरे ओढले आहेत. तसंच मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

दर वर्षी 1 ऑगस्टला विधी विभागाचा अभ्यासक्रम सुरु होणं अपेक्षित असतं. पण यंदा विज्ञान, कला, वाणिज्य शाखांचे निकाल लागले नसल्यानं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, असं याचिकाकर्त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यावर हे सगळं सर्वसामान्य परिस्थितीत शक्य आहे, पण मुंबई विद्यापीठाच्या कारभारामुळे परिस्थिती सगळ्यांच्याच नियंत्रणाबाहेर गेली असल्याचं मत कोर्टाने नोंदवलं.

याचिकाकर्त्यांनी आणखी एक मुद्दा कोर्टासमोर आणला, तो म्हणजे ऑनलाईन पेपर तपासणीवेळी मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिका सुट्या करुन त्या ऑनलाईन तपासल्या जातात. पण ऑनलाईन तपासणी झाल्यानंतर पुरवणी उत्तरपत्रिका या एकत्र जोडल्या न गेल्यानं कोणती पुरवणी उत्तरपत्रिका नेमकी कोणाची याचा काहीच मेळ बसत नसल्यानं विद्यार्थ्यांचे खरे गुण मिळणं अवघड आहे असंही याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं.

उद्या मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यावेळेस विद्यापीठ आणि राज्य सरकार काय भूमिका मांडतं हे पाहावं लागेल.