या माफियांनीच मुंबई वाचवली : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2017 08:48 AM (IST)
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'सामना'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. आम्हाला माफिया म्हणत असाल, तर या माफियांनीच 1992 साली मुंबई वाचवली. आया-बहिणींच्य अब्रूचे रक्षण केलं. इतकंच नाही तर मुंबईवरील हल्ल्यावेळी कमांडोंना जेवण पुरवणारे हेच माफिया होते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. होय, मी बॉस आहे आणि राहणारच, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'सामना'मध्ये उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. मी मनमानी किंवा दादागिरी करणारा बॉस नाही. लोकांना बँकेच्या रांगेत मारणारा बॉस नाही. मी स्वत:ला बॉस मानत नाही, पण जर मला ते मानत असतील, तर मी बॉस आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय शिवसेनेनं मुंबईत अनेक कामं केली. त्याच्या बळावरच आम्ही पुन्हा मुंबईवर भगवा फडकवू. ज्यांना शिवसेनेचं काम दिसत नाही, त्यांच्या मेंदूत खड्डे पडले आहेत, ते खड्डे 23 तारखेला भरले जातील, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला.