मुंबईत उद्या भाजीपाला आणि दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2017 07:56 PM (IST)
एक्स्प्रेस वेवरील वाहतूक थांबवल्याने पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील एकही शेतकरी आणि डेअरीची गाडी मुंबईकडे सोडण्यात येणार नाही.
पुणे : मुंबई एक्स्प्रेस वे आणि आणि जुना पुणे-मुंबई म्हणजेच एनएच 4 मार्ग मुंबईकडे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत उद्या भाजीपाला आणि दुधाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील एकही शेतकरी आणि डेअरीची गाडी मुंबईकडे सोडण्यात येणार नाही. त्यामुळे मुंबईत आता जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतल्या तुफान पावसामुळे कधीही न थांबणारा एक्स्प्रेस वेही हडबडला आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. महामार्ग पोलिसांकडून मुंबईला जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेवरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर वाहतूक बंद करणार आहेत. मुंबईवरुन आलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलिसांनी मुंबईच्या दिशेचा द्रुतगती मार्ग 6:30 पासून बंद केला. नवी मुंबईत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना बंदी नवी मुंबई वाहतूक विभागाकडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बाहेरील वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुणे आणि गोवा मार्गाने नवी मुंबईत येणाऱ्या वाहनांना शहराबाहेर थांबवण्यात येत आहे. नवी मुंबई आणि मुंबईत वाहतूक कोंडी झाल्यामुळे बाहेरुन येणारी वाहनं परत पाठवली जात आहेत. नवी मुंबईत राहणाऱ्यांनाच केवळ सोडलं जात आहे. जेएनपीटी बंदरामधून मोठ्या प्रमाणात जे कंटेनर निघतात त्यांनाही बंदी करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सायन – पनवेल हायवे, ठाणे – बेलापूर हायवे, शिळफाटा मार्ग या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी आहे. तुफान पावसामुळे मुंबईतील सर्व लोकल मार्ग, रस्ते मार्ग आणि हवाई मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे चहूबाजूंनी मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यातच आता मुंबई- पुणे महामार्गही रोखण्यात आला आहे.