मुंबई :  मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढत आपली बाजू मांडली असून आरोप सिद्ध करावेत अन्यथा परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. 


दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं पत्राबाबत म्हटलं आहे की, गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज (20 मार्च) दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. 


परमबीर सिंहांनी काय लिहिलंय पत्रात


दोन दिवसांपूर्वी लोकमत आणि एबीपी माझाच्या मुलाखतीत गृहमंत्र्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले होते की, "परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. एनआयएच्या तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून काही अक्षम्य चुका झाल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या."  याच मुलाखतीचा उल्लेख करत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकद एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल." परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात दादरा नगर हवेलीची खासदार मोहल डेलकर आत्महत्या प्रकरणात अनिल देशमुख यांनी दबाव टाकल्याचाही उल्लेख केला आहे. परमबीर सिंह यांच्या मते, 22 फेब्रुवारीला जेव्हा मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांच्या मृतदेहासह सुसाईड नोटही मिळाली. या नोटमध्ये कीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं डेलकर यांनी म्हटलं आहे. परंतु अनिल देशमुख सातत्याने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव टाकत होते.


परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार : गृहमंत्री


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, आता एक प्रसिद्ध पत्रका जारी करुन परमबीर सिंह यांनी हे आरोप सिद्ध करावे अन्यथा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिलाय. परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.  सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही? आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंह हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमबीर सिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे खोटे आरोप केले आहेत.सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंह यांनी रचलेले हे षडयंत्र आहे  मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.