मुंबई : वारंवार डेडलाईन देऊनही निकाल वेळेवर न लावल्याने मुंबई विद्यापीठाचे डॉ. संजय देशमुख यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ही कारवाई केली आहे.


मुंबई विद्यापीठाचा निकाल लावण्यासाठी झालेली दिरंगाई ही गंभीर विषय बनला होता. संजय देशमुख यांची हकालपट्टी केली जाईल, अशी यापूर्वीही चर्चा होती. मात्र अखेर राज्यपालांनी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली.

ऑनस्क्रीन मार्किंग पेपर तपासणीच्या गोंधळाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

एप्रिल- विद्यापीठाच्या सर्वसाधारण बैठकीत सर्व पेपर तपासणी ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने होणार असल्याचं कुलगुरू संजय देशमुख यांनी सांगितलं. त्यानंतर आजपर्यंत….

  • एप्रिल - ऑनस्क्रीन मार्किंगची जबाबदारी मेरिट ट्रक कंपनीला देण्यात आली.

  • 4 मे पासून ऑनलाईन मार्किंग पद्धतीने प्राध्यापकांनी पेपर तपासणीला सुरुवात केली. यावेळी 477 अभ्यासक्रमांच्या 17,67,441 उत्तरपत्रिका तापसण्याचं आव्हान होतं

  • परीक्षा होऊन 45 दिवसांची मुदत उलटल्यानंतर राज्यपालांनी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झाले नाहीत. त्यामुळे हे निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैची डेडलाईन दिली. मात्र, या मुदतीतही विद्यापीठाला पेपर तपासणीचं काम पूर्ण करता आलं नाही.

  • त्यानंतर दुसरी डेडलाईन 5 ऑगस्ट देण्यात आली. मात्र, निकाल लागणार नाही हे माहित असूनही ही डेडलाईन विद्यापीठाकडून सांगण्यात आली.

  • निकाल लवकरात लवकर लागणार नाहीत हे समजल्यावर औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, पुणे विद्यापीठाची पेपर तपासणीसाठी मदत घेण्यात आली.

  • विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यानंतर 15 ऑगस्टची तिसरी डेडलाईन विद्यापीठाकडून देण्यात आली. मात्र, त्यातही निकाल लावण्यात अपयश आलं.

  • अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी अर्ज केलेले असताना निकाल वेळेत न लागल्याने विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर राहिले.

  • अखेर राज्यपालांनी 8 ऑगस्टला कारणे दाखवा नोटीस पाठवून कुलगुरू संजय देशमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. प्रभारी कुलगुरू म्हणून कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांची नव्या टीम सोबत नियुक्ती करण्यात आली.

  • 19 सप्टेंबरला 477 निकाल जाहीर केल्याचं विद्यपीठाने जाहीर केलं. मात्र, अद्याप गहाळ उत्तरपत्रिकांच्या निकालाचं प्रश्न चिन्ह विद्यापीठासमोर कायम होतं

  • 28 सप्टेंबर-  ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ आहेत, अशा 2300 विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचं विद्यपीठाकडून सांगण्यात आलं.

  • 17 ऑक्टोबर - परिपत्रक काढून 2300 विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले. मात्र, पुनर्मुल्यांकणासाठीचे अजूनही 24 हजार विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याचं काम बाकी आहे. शिवाय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्र परीक्षा सुरु होणार आहेत. विद्यापीठाने एटीकेटी परीक्षा अर्जांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढ दिली आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत रखडलेले पुनर्मुल्यांकणाचे निकाल लावू, असं विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं आहे.

  • 24 ऑक्टोबर - वारंवार डेडलाईन देऊनही निकाल वेळेत न लावल्यामुळे अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत संजय देशमुख यांची राज्यपालांकडून हकालपट्टी करण्यात आली.


संबंधित बातमी : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंची अखेर हकालपट्टी!