वसई : मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये 21 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भाईंदरच्या जैसल पार्क परिसरात खाडी किनारी तरुणाने जीव दिला. पोलिसांच्या दडपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा दावा मित्राने केला आहे. विशेष म्हणजे मृत युवक मुंबईमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा आहे.


पोलिसांचा त्रास, खोटया गुन्हयात अडकवण्याची भाषा याबाबत अनेकांकडून आरोप केले जातात. मात्र पोलिसांच्या याच दडपणाला घाबरलेल्या 21 वर्षीय तरुणाने चक्क आपलं जीवनच संपवल्याचं म्हटलं जात आहे. विक्की भाडे असं मयत तरुणाचं नाव आहे. सध्या या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

प्रत्यक्षदर्शी असलेल्या विक्कीच्या मित्राच्या दाव्यानुसार मयत विक्की आणि त्याचे मित्र भाईंदरच्या जैसल पार्क खाडी किनारी रात्रीच्या सुमारास मित्रांसोबत दारु पित होते. पोलिसांनी त्यांना हटकून, खाडी किनाऱ्याच्या चौकीत आणलं. तिथे पोलीस आणि विक्की यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर पोलिसांनी कंट्रोलरुमला फोन करुन पोलिस व्हॅन मागवली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या विक्कीने समुद्रात उडी मारली.  त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांला त्याच्या मित्राला वाचवण्यात यश मिळालं. परंतु विक्की समुद्रात बुडून मृत्युमुखी पडला.

विक्कीच्या शेवटच्या कॉलवरुन विक्कीला पोलिसांनी त्रास दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी होणार आहे. सीआयडीची एक टीम नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.