भिवंडी : भिवंडी शहरातील साईनगर ताडाळी अंजुरफाटा रोड येथे गुरुवारी झालेली क्षुल्लक वादातून मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांवर तीन ते चार जणांनी अॅसिड फेकून हल्ला केला. ज्यात सहा जण भाजले असून त्यापैकी तिघांना ठाणे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.


भिवंडीतील ताडाळी साईनगर येथील निखिल शर्मा हा गुरुवारी (8 ऑक्टोबर) कामावरुन घरी परतत असताना त्या परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीचा धक्का लागल्याने मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर निखिल शर्मासह त्याचे मित्र अभिषेक देशमुख ,अभिषेक शर्मा ,रोहित पांडे आ सुरज पटेल हे का मारहाण केली याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी गेले. तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली आणि मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी एका गटाकडून बेसावध असणाऱ्या या मुलांवर समोरच्या तीन ते चार व्यक्तींनी अॅसिड फेकले. या अचानक झालेल्या हल्ल्याने हे 5 ते 6 युवक भाजल्याने विव्हळत तेथून पळत आपल्या घराकडे आले. या भांडणात महिलाही जखमी झाली आहे.


भाजल्याने जखमी झाल्याने या मुलांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यापैकी अभिषेक देशमुख ,निखिल शर्मा आणि अभिषेक शर्मा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाण्यातील कळवा इथल्या रुग्णालया दाखल केलं. दरम्यान स्थानिक नारपोली पोलिसांनी या जखमी युवकांचे जबाब नोंदवून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.