नरेंद्र मोदी आज (30 मे) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. आज तब्बल 50 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेतील.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या विधानपरिषद आमदारांचा प्रामुख्याने समावेश आहे. जनतेमधून निवडून गेलेल्या आमदारांना संधी मिळालेली नाही. तशीच स्थिती केंद्रीय मंत्रिमंडळातही दिसत असल्याची कुजबूज शिवसेनेत आहे. "एक मंत्रिपद निवडून आलेल्या खासदाराला मिळालं आहे, तर दुसरं मंत्रिपद राज्यसभेतील खासदारांना म्हणजेच अनिल देसाई किंवा संजय राऊत यांना मिळेल अशी भीती शिवसेनेच्या ग्रामीण भागातील खासदारांना आहे.
सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील खासदाराला मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. पण एक मंत्रिपद मुंबईत गेल्याने दुसरं मंत्रिपद ग्रामीण भागात मिळावं, यासाठी खासदार आग्रही आहेत. तसंच मंत्रिपदं लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांना द्या, राज्यसभेतल्या खासदारांना मंत्रिपद नको, अशी कुजबूज शिवसेना खासदारांमध्ये वाढली आहे. त्यामुळे उरलेलं मंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.