मुंबई: मुंबईतील रस्त्यांची काम सुरू करायच्या आधीच काँन्ट्रॅक्टरला 600 कोटी रुपये देण्याची तयारी असलेल्या खोके सरकारने मुंबईच्या रस्त्यात घोटाळा केला आणि 40 टक्के कमिशन खाल्लं असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. खोके सरकारच्या चोरीची फाईल तयार असून ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी तुमची जागा दाखवणार असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करणार असल्याचं खोके सरकारने सांगितलं. एखादा रस्ता खोदायला गेला किंवा तयार करायला गेला तर एकून 42 प्रक्रियातून काम केलं जातं. वाहतूक पोलिसांनाही विचारावं लागतं, तसेच राज्य सरकारच्या आणि केंद्राच्या 16 एजन्सी आहेत, त्यांना विचारावं लागतं. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात की मुंबईत 400 किमीचे रस्ते तयार करणार. 


पाच लोकांसाठी ही कामं 


मुंबईतील रस्ते हे पाच लोकांसाठी तयार करण्यात येत असून पाच लोकांना त्याचं काम दिलं जात आहेत असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांचं काम हे पाच झोनमध्ये केलं जात आहे. पाच लोकांना काम दिलं जाऊन त्यामध्ये कमिशन खाल्लं जात आहे. रस्त्यांच्या किमती वाढवल्या, टेंन्डरमध्ये घोटाळा केला. पाच हजार कोटींच्या रस्त्याची किंमत 6080 कोटी रुपये वाढवली. 40 टक्के कमिशन खाल्लं.


आदित्य ठाकरे म्हणाले की, हा आक्रोश आणि ही गर्दी पाहिल्यावर समझने वालों को इशारा काफी है हा संदेश जातोय. ही जी गर्दी आहे, जे भगवं वादळ दिसत आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. इकडचा आवाज आता दिल्लीलाही ऐकायला लागतोय.  आजूबाजूंच्या भुतांना गाढायचं आहे, या खोके सरकारला गाढायचं आहे. 


आम्ही जी 20 वर्षात कामं केली ती आता दाबली जात आहेत. एक वर्ष झालं अजून महापालिकेला महापौर नाही, नगरसेवक नाहीत, समित्या नाहीत, त्यामुळे कामं खोळांबळी आहेत असं आदित्य ठाकेर म्हणाले. 


आदित्या ठाकरे म्हणाले की, अलिबाबा आणि चाळीच चोरांनी या मुंबईला लुटलं, त्यांच्या मित्रांना आणि बिल्डरना काम दिली जात आहेत, भ्रष्टाचार केला जात आहे. खोके सरकारचा फोन आला की त्यांची कामं होतात पण सर्वसामान्यांची कामं होत नाहीत हे दुर्दैव. महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याची चौकशी केली जावी अशी मागणी आम्ही राज्यपालाकडे केली आहे. 


खोके सरकारने काम न करता फोडाफोडीचं काम केलं. आता एकदोन नगरसेवकांनी सांगितलं की त्यांना आयपीएस अधिकाऱ्यांचा फोन येतो की मुख्यमंत्र्यांची ऑफर आहे, शिंदे गटात जा असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.