मुंबई : "मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation ) निवडणुकीसाठी शिवसेनेने (Siv Sena) प्रथम 150 चा नारा दिला आहे. अमित शाह हे केंद्रीय नेते आहेत, त्यांनी 150 चा नारा देणं म्हणजे आमची कॉपी आहे. शिवाय धोके कोण कोणाला देत आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वजण पाहात आहेत. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत. शिवाय आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार, तुम्ही आस्मानात आहात ते आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू असा इशारा शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या टिकेला उत्तर देताना दिला आहे.  


"राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या टिकेला शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी देखील अमित शाह यांच्या या टिकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 


मुंबईकरांना दररोजचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण भेटतं हे महत्वाचं आहे. आमचे शाखाप्रमुख हे मुंबईतील जनतेला प्रथम भेटतात. मुंबईकरांचे प्रश्न शिवसेना समजून घेते. तुमचे मनसुबे आता सर्व राज्यांना आणि सर्व पक्षांना समजले आहे. सर्व पक्षांना संपवायचं आणि आपलं एकट्याचं राज्य आणण्याचा यांचा प्रयत्न आहे, परंतु, जनतेला यांचं खरं रूप माहित झालं आहे, असा हल्लाबोल पेडणेकर यांनी केलाय. 


"उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये झालेल्या मिटींगला मी शिवसेना नेता म्हणून हजर होतो. त्यावेळी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्यावर चर्चा झाली होती. एवढं होऊन जर अमित शाह हे उद्धव ठाकरे यांना धोक दिला असं म्हणत असतील तर ती भयानक चीड येणारी गोष्ट आहे. या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. ते ठाकरे आहेत, ते यांच्यासारखे इकडून तिकडे पलटणारे नाहीत. संपूर्ण देश म्हणत आहे आता भाजपला जमीन दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हीच यांना जमीन दाखवू, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपला दिला आहे.  


चंद्रकांत खैरे म्हणाले, "आम्ही विकासासाठी महाविकास आघाडी केली. आमचं बोट पकडून निवडून आले आणि आज आम्हालाच संपवायला पाहात आहेत. उद्धव ठाकरे यांना तुम्ही काय जमीन दाखवणार आम्हीच तुम्हाला जमीन दाखवणार. 1988 ला औरंगाबाद महापालिकेत भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नव्हता. त्यावेळी भाजपने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आमचे बोट धरून हे वर आले आहेत.  पैसे देऊन लोकांना फोडले जात आहे. आम्ही दोघे हे हनुमान भक्त आहेत, त्यांनी खोटं बोलू नये. भाजपच्या राजकारणावर जनतेला राग आहे.  1988 लाच आम्ही यांना जमीन दाखवली आहे." 


"शिवसेना आणि मुंबईच्या नागरिकांचं नातं दृढ आहे. मुंबईची माणसं कृतज्ञ आहेत. दुष्काळात देखील मुंबईला पिण्याचं पाणी मिळतं. त्या पाण्याची प्रतारणा मुंबईचा नागरिक करणार नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी लोकांना कशी मदत केली हे जनतेला माहित आहे. परंतु, यांची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात गंगेत प्रेतं वाहून गेल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. भाजपच्या घोषणांना मुंबईचा नागरिक भूलणार नाही. उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला तर तुम्ही त्यावेळी हा प्रश्न सोडवण्यासाठी येण्यापेक्षा हरियाणाला निघून गेला. दिल्ली पंजाब प्रमाणे महाराष्ट्रात देखील भाजपला भूईसपाट करू. मागे अमित शाह हे पटक देंगे म्हटले, परंतु नंतर मातोश्रीवर आला होता हे विसरू नका. ओठात एक आणि पोटात एक असं भाजपचं आहे. भाजपने उपकाराची जाणीव ठेवावी.  आताची भाजप शब्द बदलणारी आहे. आम्हाला कोणीही हरवू शकत नाही.  महाराष्ट्रात यांचं अस्तित्व नव्हतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून राज्यात आले. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की आम्ही राष्ट्र पाहतो, तुम्ही राज्य पाहा. परंतु, नंतर भाजपने आपला शब्द फिरवला, अशी टीका  शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर केली आहे.   
 
"भाजप स्वबळावर निवडणुका का लढवत नाही? अमित शाहांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. कोण कोणाला धडा शिकवेल हे ठरवू. दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलाय. ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवली आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा देखील उद्धव ठाकरे यांचाच होणार. शिवसेला संपूर्ण संपवण्याचा दिल्लीश्वरांचा डाव आमच्यातीलच काही लोकांना सोबत घेऊन यशस्वी केला जात आहे. आम्हाला दसरा मेळाव्याला परवानगी नाही दिली तर आम्ही कोर्टात जावू. शिवसेनेला त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू आहे. परंतु, उद्धव ठाकरे हे अधिक जोमाने जनतेसमोर येत आहेत. भाजपचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.   


महत्वाच्या बातम्या


Amit Shah Mumbai Tour: मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा; अमित शाह यांनी दंड थोपटले