मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जागेवरून महाविकास आघाडीत जागावाटपावरून तणाव निर्माण झाला. खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या नावावरून ठाकरेंच्याच पक्षात मतभेद उफाळल्याचं दिसून आलं. मात्र शेवटी असे काही चक्रं फिरली की त्यामुळे शरद पवारांच्याच नावाची घोषणा करावी लागली. मात्र त्यामुळे काँग्रेसमधील एक गट आणि आदित्य ठाकरेंच्या नाराजीला उद्धव ठाकरे कसं सामोरं जातात हे पाहावं लागेल.
राज्यसभेच्या राज्यातील सात जागांची निवडणूक जाहीर होताच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे जवळपास स्पष्ट होतं. मात्र, महाविकास आघाडीत संघर्ष पेटला तो संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर. शरद पवारांनाच राज्यसभेत पाठवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. आदित्य ठाकरे यांनी मात्र संख्याबळ आणि रोटेशन पॉलिसीचा दाखला देत पक्षाचाच दावा ठोकला. त्यामुळे एका जागेवरून ठाकरेंच्याच पक्षात दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
Rajya Sabha Seat Dispute : काँग्रेसचाही जागेवर दावा
राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसलाही या जागेची गरज होती. त्यामुळे विधान परिषदेत बदल्यात ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला राज्यसभेत पाठवावं, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. दरम्यान, मविआची संयुक्त बैठक न होता प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडत होता. समन्वय असल्याचं सांगितलं जात असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुढे करत काँग्रेसने शरद पवार यांच्यावर उघडपणे दबाव टाकण्यास सुरुवात केली.
Political Strategy : सातव्या जागेवर महायुतीची नजर
राजकीय वर्तुळात दोन शक्यता चर्चेत होत्या. पहिली म्हणजे मविआतील गोंधळाचा फायदा घेत महायुती सातव्या जागेवर उमेदवार देऊ शकते. मतांची थोडीफार फूट पडल्यास सातवी जागाही महायुती जिंकू शकते, अशी चर्चा होती.
दुसरी शक्यता म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना करणाऱ्या शरद पवारांनाच डावलून इतर कोणाला राज्यसभेत पाठवल्यास मविआत एकवाक्यता नाही असा संदेश जाईल. त्यामुळे मविआचं राजकीय नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर या पार्श्वभूमीवर मविआतील सर्व पक्षांनी शरद पवार यांचंच नाव अंतिम केल्याचं स्पष्ट झालं.
Congress Concern : विलिनीकरणाचा मुद्दा आणि शंका
काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह असा होता की, शरद पवार मविआच्या मतांवर राज्यसभेत गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं आणि ते सत्तेत गेले तर काय? या प्रश्नावर स्पष्ट भूमिका येत नव्हती.
या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येत विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या काही गटाचं समाधान झालं असलं तरी पूर्ण नाराजी दूर झालेली नाही, असं चित्र आहे.
Uddhav Thackeray Challenge : आदित्य आणि काँग्रेसची संभाव्य नाराजी
उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता दोन संभाव्य नाराजींचं आव्हान उभं आहे. एक काँग्रेसची आणि दुसरी स्वतःच्या पक्षातील आदित्य ठाकरेंची. गेल्या काही दिवसांत आदित्य ठाकरेंनी राज्यसभेची जागा सोडणार नसल्याची भूमिका आक्रमकपणे मांडली होती. मित्रपक्षांनी वारंवार ज्येष्ठ नेत्यांची नावं पुढे करून आमच्या वाट्याच्या जागा घेतल्या तर पक्षाची वाढ कशी होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
महाविकास आघाडीमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा आणि सल्लामसलती सुरू होत्या. मात्र, पर्याय संपत चालल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचंच नाव पुढे करण्याशिवाय मविआसमोर दुसरा पर्याय उरला नव्हता.
ही बातमी वाचा:
