मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले तरी मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कसं सुरु करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे.


यापूर्वी शाळांबाबत राज्य सरकारने वेगळे आदेश पारित केले होते. मात्र मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या 31 डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असा निर्णय घेतला.


शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहिल्याने प्रशासनाला तयारीसाठी बराच वेळ मिळणार आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये टेस्टिंग कॅम्प सुरु आहेत. सॅनिटायझेशन केलं जात आहे. ही मास टेस्टिंग मोहीम ही कालपासूनच महापालिकेने राबवायला सुरु केली आहे. शिक्षकांच्या टेस्टिंग करणं त्यानंतर काळजी घेण्याच्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं याच्या तयारीसाठी महापालिकेला 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.


दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढवणं मुंबई महापालिकेसाठी गरजेचं आहे. या संभाव्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याची तारीख पुढे ढकलल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत कोणतीही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहेच, शिवाय मुंबई महापालिकेला तयारीसाठी वेळ मिळावा ही देखील त्यामागील भूमिका आहे. मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शाळा ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचं सॅनिटायझेशन होणं गरजेचं आहे. आता हळूहळू या सेंटरची संख्या कमी केलेली आहे. अजून अनेक शाळांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही. त्यामुळे तेवढा कालावधी मिळणं हे प्रशासनासाठी गरजेचं आहे."