मुंबई: राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही (NCP Political Crisis) मुंबई अध्यक्ष बदलण्यात आला असून त्या ठिकाणी राखी जाधव (Rakhi Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या ठिकाणी ही नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून ही नियुक्ती करण्यात आली. या आधी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


नबाव मलिक यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा अतिरिक्त भार हा महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली. दरम्यानच्या काळात नवाब मलिक हे जामीनावर बाहेर आले असले तरी त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती. ते अजित पवार गटाला साथ देणार असल्याचीही चर्चा होती. पण मलिकांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केली नाही. 


अजित पवार गटाकडून समीर भुजबळ यांची नियुक्ती


अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांच्या ऐवजी समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटाकडून देखील अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार गटाने आता राखी जाधव यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 


कोण आहेत राखी जाधव?


राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत.  राखी जाधव घाटकोपरमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या त्या जवळच्या मानल्या जातात. 


नवाब मलिकांची भूमिका तटस्थ


दरम्यान, नवाब मलिक जेलमधून जरी बाहेर आले असले तरी वैद्यकीय कारणास्तव सध्या ते पक्षीय कामकाजात सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी दुसऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यानंतर नवाब मलिक तुरुंगात होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांना वैद्यकीय आधारावर सुप्रीम कोर्टाकडून दोन महिन्यांचा जामीन मिळाला. परंतु राष्ट्रवादीतीली फुटीनंतर आपला पाठिंबा कोणाला याबाबत त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही.


ही बातमी वाचा: