मुंबई: शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आलेलं भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं आहे, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.


मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची प्रकृती चितांजनक आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी राजू शेट्टी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जेजे हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

धर्मा पाटील यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाची दारं झिजवूनही दाद मिळत नसल्याने, धर्मा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

सेंट जॉर्ज रुग्णालयात धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर